अकोला दिव्य न्यूज : अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने केवळ १ गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.

•भारतीय गोलंदाजाचा पराक्रम• या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकात केवळ ८२ धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी फक्त ८३ धावांची गरज होती. ज्याचा भारतीय संघाने सहज पाठलाग केला. भारताकडून जी त्रिशाने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर वैष्णवी, आयुषी आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. शबनम शकीलला एक विकेट मिळाली. •भारतीय फलंदाजांनीही कमाल केली•
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी केली. ८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने केवळ एक विकेट गमावली. टीम इंडियाची सलामीवीर जी कामिनी केवळ ८ धावा करून बाद झाली. मात्र, दुसरी सलामीवीर आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या जी त्रिशाने ३३ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी खेळली. तर सानिका चाळके २२ चेंडूत २६ धावा करून नाबाद माघारी परतली.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘चॉकर्स’ हा शब्द आफ्रिकन क्रिकेट संघासाठी वापरला जातो. मोठ्या टूर्नामेंटच्या फायनलमध्ये किंवा महत्त्वाच्या मॅचमध्ये हा संघ अनेकदा पराभूत होताना दिसला आहे.

या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय आहे. याआधी भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ९ गडी राखून सहज पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते. २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही ट्रॉफीही जिंकली होती. महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.