अकोला दिव्य न्यूज : मान्सूनचे महाराष्ट्रात दणक्यात आगमन झाले असून पावसाने अकोला जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावत एकच दाणादाण उडविली. या पावसासोबतच सतत विजेच्या कडकडाटाने वातावरणात एक वेगळाच थरार अनुभवता आला. पावसाने काही ठिकाणी अडचणी निर्माण केल्या असून अकोल्यात पावसाने मे महिन्यात 82 वर्षांचा रेकॉर्ड तोडला असून आजच्या पावसाने त्यात अधिक भर टाकली आहे.

आज मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वीजेच्या कडकडाट सुरू झालेल्या या पावसाने सगळ्यांची एकच दाणादाण उडविली. जवळपास अडीच तासांपर्यंत जोरदार बरसलेल्या पहिल्याच पावसात शहरातील नालेसफाईची पोलखोल उघडकीस आली. जवळपास सगळंच शहर जलमय झाले असून गरीब वस्तात्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. शहरातील जनजीवन विस्कळित झाले असून मोठे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.
ऐन मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात आज दुसऱ्यांदा बरसलेल्या जोरदार पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले आहे.अनपेक्षित आलेल्या या पावसामुळे शेतीची मशागत, बियाण्यांची जमवाजमव, खतांची साठवणूक अशी महत्त्वाची पावसाळ्यापूर्वीची कामे खोळंबली आहेत.
सध्या रबी हंगामाची काढणी सुरू असून नवीन खरीप हंगामासाठी नांगरणी, बी बियाणे आणि खतसाठवणीच्या तयारीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला असताना पावसाने लावलेल्या हजेरीने शेतशिवारात पाणी साचले असून शेतात ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांची हालचाल करणे कठीण झाले आहे. हवामानाच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात, काढणी केलेल्या विविध पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचेच पंचनामे करण्याचे सरकारी धोरण असल्याने काढलेल्या पिकांच्या नुकसानीला मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.