अकोला दिव्य न्यूज : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्यात वाक् युद्ध रंगले आहे.

रवी राणा म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजय खोडके यांनी महायुतीच्या विरोधात काम केले. प्रचाराच्या फलकांवर स्वत:चे छायाचित्र देखील लावू दिले नाही. त्यांनी उघडपणे नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार केला. पण, जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुलभा खोडके या अमरावतीत राष्ट्रवादीकडून लढत होत्या, तेव्हा अजित पवार यांचे मला ५० वेळा फोन आले. खोडके यांना मदत करा, म्हणून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे देखील फोन आले. केवळ २ हजार मतांनी त्या निवडून आल्या. संजय खोडके हे आज त्या बळावर वाजत आहेत. पण, मी जर वरिष्ठ नेत्यांचे ऐकले नसते आणि अमरावतीतून एक फेरफटका जरी मारला असता, तरी १० हजार मतांनी त्यांना पराभूत केले असते, असा दावा रवी राणा यांनी केला.

संजय खोडके यांनी एवढी गुर्मी करू नये. दादागिरी करू नये, मोठ्या माणसाने नम्र असले पाहिते, लवचिक असले पाहिजे, सगळ्यांना विनंती केली पाहिजे. पण, तीन वेळा पराभूत करूनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, जे लोक अहंकारात राहतात, त्यांना जनतेने धडा शिकवला आहे, असा टोला रवी राणा यांनी लगावला.
संजय खोडके यांचे प्रत्युत्तर
संजय खोडके म्हणाले, रवी राणा हे नेहमीच मला धमक्या देत आले आहेत. आपण खोडके यांचा तीन वेळा पराभव केल्याचे रवी राणांनी म्हटले आहे. पण, जनता ही कुणाला निवडून द्यायचे हे ठरवत असते. तीन वेळा पराभव झाला, हे आम्ही मान्य केलेच आहे. मला त्याची खंत नाही. पण, रवी राणांमध्ये आपल्याला पराभूत करण्याची ताकद नाही. अजित पवार यांनी पन्नास वेळा फोन केल्याचे त्यांनी सांगितले आहे, पण हे सर्व खोटे आहे.
याउलट लोकसभा निवडणुकीच्या वेळी रवी राणांनी अजित पवार यांना फोन केले होते. मी प्रचारात यावे, यासाठी त्यांनी अजित पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. विमानतळावरून कार्यक्रमस्थळी जात असताना रवी राणा हे अजितदादांना सतत खोडकेंना स्टेजवर बोलवा, अशी विनवणी करीत होते. पण, खोडके हे येणार नाहीत, हे त्यांनी आपल्याला आधीच सांगितले आहे, तुम्ही बोलावले म्हणून मी प्रचाराला आलो, असे अजितदादांनी रवी राणा यांना सुनावले होते, असा दावा संजय खोडके यांनी केला.