अकोला दिव्य न्यूज : एकविसाव्या शतकात भारतातील सर्वात मोठ्या विमान अपघातात तब्बल २७५ लोकांच्या अपघाती मृत्यूने अख्खं समाजमन ढवळून निघालं. तर जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातीच नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अपघातग्रस्त विमानातून केवळ एकमात्र प्रवासीचा जीव वाचला तर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला विमानाची धडक बसल्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागले असताना प्रसंगावधान राखून अकोल्यातील भगवानदास तोष्णीवाल यांची नात ऐश्वर्या अमोल तोष्णीवाल हिने या भयानक अपघातातून स्वत:चा जीव वाचवला आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. हे विमान ज्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले तिथेही मोठा स्फोट झाला. याच हॉस्टेलमध्ये पाचव्या मजल्यावर ऐश्वर्या होती. चहुबाजूने लागलेली आग आणि धुराच्या लोटात अडकलेल्या ऐश्वर्याने अंगावर ब्लँकेट ओढून जीव वाचवला आहे. या दुर्घटनेत ऐश्वर्या सुखरुप असल्याने कुटुंबानेही सुटकेचा निश्वास सोडला.

ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. अलीकडेच ती तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अकोला इथं आली होती. घटनेच्या दिवशी दुपारी १.३८ मिनिटांनी जेव्हा एअर इंडियाच्या फ्लाईटने लंडनसाठी उड्डाण घेतले तेव्हा ऐश्वर्या तिच्या हॉस्टेलमधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गाढ झोपेत होती. त्याचवेळी अचानक जोरदार स्फोट झाला. चहुबाजुने धुराचे साम्राज्य पसरले. मी जेव्हा झोपेत होते तेव्हा मोठा आवाज आला त्यामुळे मी चटकन जागी झाली. माझ्या खोलीत धूर पसरला होता. बाहेरून किंचळण्याचा आवाज येत होता असं तिने सांगितले.
याच परिस्थितीत प्रसंगावधान राखत ऐश्वर्याने तिच्या खोलीतील ब्लॅंकेट उचलले आणि स्वत:भोवती गुंडाळून खोलीबाहेर आली. त्यावेळी इमारतीत आग लागली होती. सगळीकडे धूर पसरला होता. त्यात काळोखात तिने मार्ग शोधत शोधत पाचव्या मजल्यावरून खाली सुरक्षित आली. या घटनेत तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर आगीचे चटके बसल्याच्या खूणा आहेत. परंतु या भयानक स्थितीत तिने स्वत:ला सुरक्षित वाचवले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात भयंकर अनुभव होता, इतक्या धुरामध्ये काहीच दिसत नव्हते तरीही मी त्यातून मार्ग काढून पुढे आली असं ती म्हटली.
वडिलांना लावला फोन
अपघातातून सुखरुप वाचल्यानंतर ऐश्वर्याने सर्वप्रथम तिचे वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा ते अकोल्यातील त्यांच्या दुकानावर होते. मुलीचा थरथरणारा आवाज पाहून वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. जेव्हा ऐश्वर्याचा फोन आला तेव्हा मी घाबरलो. टीव्हीवर अपघाताची बातमी पाहिली आणि मन सुन्न झाले होते. परंतु मुलगी सुरक्षित असल्याने जीवात जीव आला. अमोल यांनी तातडीने दुकान बंद केले आणि घरी पोहचले. मुलगी सुखरुप असल्याचे ऐकून आई, आजी-आजोबांनाही दिलासा मिळाला.