अकोला दिव्य न्यूज : अहमदाबादमधील विमान अपघाताला तीन दिवस झाले नाहीत तर आणखी एक अपघाताची बातमी समोर आली आहे.उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केदारनाथ जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून यामध्ये पायलटसह ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान क्रॅश झाले. खराब हवामानामुळे हा अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे. डेहराडूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाले, असे उत्तराखंडचे एडीजी लॉ अँड ऑर्डर डॉ. वी. मुरुगेशन यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर अपघाताचे कारण अजून समजू शकलेले नाही. घटनेची प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेत ५ प्रौढ, एक मुलगा आणि पायलट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समजत आहे. एनडीआरएफ टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. अपघाताच्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या अवशेषांचा ढिग पडलेला आहे.
केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही चारधाम यात्रेदरम्यान अनेक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहेत, तसेच काही हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंगही करण्यात आली. याआधीही अनेक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका हेलिकॉप्टरला रस्त्याच्या मधोमध क्रॅश लँडिंग करावी लागली होती. चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर लगेचच एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते, ज्यात अनेक लोकांचा जीव गेला होता.

या घटना लक्षात घेऊन केदारनाथ मार्गावरील हेलिकॉप्टरच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. दररोज हेलिकॉप्टरच्या 60 फेऱ्या कमी करण्यात आल्या असून, सरासरी 200 ते 250 फेऱ्या हेलिकॉप्टरद्वारे होतात. डीजीसीएने (DGCA) सतत होणाऱ्या अपघातांनंतर हा निर्णय घेतला. केदारनाथ मार्गावर डीजीसीएने नियम अधिक कडक केले आहेत. नवीन आदेशानुसार, गुप्तकाशीहून एका तासात 2 हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतील आणि 8 तासांमध्ये एकूण 16 हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतील.
हेलिकॉप्टरच्या फेऱ्या कमी केल्याने प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणांवर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. केदारनाथमध्ये यापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.