गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. मात्र, अशा कठीण प्रसंगी धैर्य, मायेची उब आणि देवाची कृपा लाभली, तर…तर जीवनाची विस्कटलेली गाडी अवघ्या काही दिवसात सहजपणे रुळावर येते, हा अनुभव डॉ.चंचल भंडारी व भंडारी कुटुंबाला तर आलाच. पण या घटनेनंतर भंडारी कुटुंबाला सबळ आधार देणारे अकोला येथील कापड व्यापारी संतोष मोहनलाल राठी आणि त्यांच्या मित्रांसाठी ‘सलाम इस दोस्ती को’ असं म्हणावेच लागेल !
अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघातात विमान जमीनीवर कोसळल्यानंतर स्फोट होऊन आगीचे लोळ उठले. त्यामुळे परिसरातील नागरी वस्तीत आग लागली होती. आगीच्या विळख्यात डॉ. चंचल भंडारी यांचे घरही सापडले. आगीत संपूर्ण साहित्य खाक झाले.

अहमदाबाद विमान अपघातात अकोट येथील दाऊलाल भंडारी यांची नात व डॉ. चंचल भंडारी यांची अडीच वर्षाची चिमुकली अत्यंत अकल्पित संकटातून बचावली आहे. तिची देखरेख करणारी आया ही देवदूत ठरली, यात तीळमात्र शंका नाही. परंतु विमान अपघाताच्या काही क्षण आधी, काही क्षणांतच विमानाचा स्फोट होऊन परिसरात आग लागली. या आगीत डॉ. चंचल भंडारी यांचे घरही सापडले. आगीत फक्त घराच्या भिंती आणि छत शिल्लक राहिले. सर्वकाही भस्मसात झाले. चिमुकल्या मुलीचा जीव वाचला, हे सर्वात मोठे भाग्य, पण आता पुढचं कसं हा प्रश्नाचं होता. पण देवाची कृपा असल्याने अवघ्या काही तासांतच हा प्रश्न निकाली निघाला.
चोहट्टाबाजार येथे कापड विक्रीचा व्यवसाय असल्याने संतोष राठी व दिनेश राठी आणि अकोटचे रहिवासी दाऊलाल भंडारी यांची ओळख होतीच.या घटनेची माहिती मिळताच भंडारी यांनी दिनेश राठींना सविस्तर माहिती दिली. दिनेशने त्याचा भाऊ संतोषला ही माहिती देताच क्षणाचाही वेळ न दवडता संतोष राठी यांनी आपल्या मित्राला माहिती देऊन चंचल भंडारी यांना तातडीने जीवनावश्यक वस्तू आणि इतर साधन सामुग्रीची मदत करण्याचे सांगितले.
अवघ्या काही तासात जीवनावश्यक वस्तू, जेवण, लहान मुलीसाठी रेडिमेड कापड, दुध व औषधी तसेच डॉ.चंचल यांचासाठी कपडेलत्ते व इतर वस्तू घेऊन राठींचे मित्र हजर झाले. एवढेच नाही तर सतत दोन दिवस डॉ. भंडारी यांना आवश्यकता असलेली साधनसामग्री देण्यासोबतच दोन्ही वेळ गरमागरम जेवण देऊन नवं बळ दिले. निश्चितच हे काम कौतुकास्पद असून अशा लोकांमुळेच इतरांना प्रेरणा मिळते. महत्त्वाचे म्हणजे ही माहिती डॉ. चंचल राठी यांनी स्वतः दिली. एवढेच नव्हे तर भंडारी कुटुंबाने सुध्दा कौतुक केले. परंतु लिखाणाचा हा प्रपंच यासाठी नसून संकट म्हणजे काय ? खरा मित्र कोण ? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर अशाच घटनेनंतर मिळतात. हे लक्षात आणून देण्यासाठीच हे लेखन.
जेव्हा, एखादी व्यक्ती अडचणीत असते, तेव्हा तिला मदतीची गरज असते. अशावेळी जो व्यक्ती मदतीसाठी धावून येतो, तोच खरा मित्र ! खरा मित्र तुमच्या चांगल्या-वाईट वेळेत तुमच्या पाठीशी उभा राहतो. जो तुमच्या सुख-दुःखा सोबतच तुमच्या शब्दाला मान ठेवून, अपेक्षा न बाळगता तुम्ही सांगितलेल्या लोकांनाही मदतीला धावून जातो, तोच खरा मित्र आणि असे अनेक मित्र असले की तुम्ही जगातील सर्वात बलवान व्यक्ती होतात. म्हणून अकोल्यातील कापड व्यापारी संतोष मोहनलाल राठी आणि त्यांच्या मित्रांसाठी ‘सलाम इस दोस्ती को’ !