Monday, June 16, 2025
HomeUncategorizedअकोल्यात दिवसाढवळ्या घरफोडी व चोरीचे सत्र ! जठारपेठेत भीतीचे वातावरण

अकोल्यात दिवसाढवळ्या घरफोडी व चोरीचे सत्र ! जठारपेठेत भीतीचे वातावरण

अकोला दिव्य न्यूज : दिवसाढवळ्या घरफोड्या व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जठार पेठ, प्लॉट, गुप्ते रोड, न्यु तापडिया नगर व महाजनी प्लॉट परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः प्लॉट भागात काल रविवारी भरदिवसा झालेल्या घरफोडीने कायदा-सुव्यवस्थेवर थेट आघात मानला जात आहे.

भरदिवसा घरफोडी – पोलिसांना खुले आव्हान!
१५ जून रोजी दुपारी, चारचाकी वाहनातून आलेल्या टोळीने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, अन्य मौल्यवान वस्तू लंपास केल्या. काही स्थानिकांनी या टोळीला पाहिले असले तरी, ते क्षणार्धात पसार झाले. या घटनेनंतर परिसरातील महिला, वृद्ध नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे.

घरातही असुरक्षित वाटतं– नागरिकांचा संताप
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आपली भीती व्यक्त केली. “आता घरात एकटे राहणेही धोक्याचे वाटत आहे. दिवसाही दरवाजे बंद ठेवावे लागत आहेत,” असे महिलांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने पावले उचलावी, अन्यथा नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनेकांनी दिला.

निलेश देव मित्र मंडळाचे शिष्टमंडळ पुढे सरसावले
या घटनांच्या पार्श्वभूमीवर निलेश देव मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश देव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच रामदास पेठ पोलिसांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी खालील मागण्या मांडण्यात आल्या:


गस्त आणि पोलीस उपस्थिती वाढवावी:
विशेषतः संध्याकाळी व पहाटेच्या वेळेस प्लॉट, जठार पेठ, गुप्ते रोड, अरुंद गल्ल्या आणि महत्त्वाच्या चौकात पोलीस गस्त सतत सुरू ठेवावी.

सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार:
सार्वजनिक ठिकाणी आणि महत्वाच्या चौकात नविन सीसीटीव्ही बसवावेत. नादुरुस्त कॅमेरे त्वरित दुरुस्त करावेत.

संशयितांवर लक्ष ठेवून तात्काळ कारवाई:
अनोळखी व्यक्ती, भटक्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करावे.

नाकाबंदी मोहिमा प्रभावीपणे राबवावी: मुख्य रस्ते, गल्ल्यांमध्ये विशेष नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी करावी.

नियमित पोलीस–नागरिक संवाद सभा:
नागरिकांचे प्रश्न थेट ऐकण्यासाठी आठवड्याला एकदा पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद बैठक घेण्याची व्यवस्था करावी.

पोलीस प्रशासनाचे आश्वासन
या चर्चेत पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, “ही घटना गंभीर आहे. पोलिसांकडे काही महत्त्वाचे धागेदोरे असून तपास जलद गतीने सुरू आहे. गस्त वाढवण्यात आलेली असून नागरिकांनी भीती न बाळगता सहकार्य करावे.

फक्त चोरी नव्हे, तर सुरक्षिततेवर घाव! – निलेश देव
शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर निलेश देव यांनी म्हटले की, “हा प्रकार केवळ मालमत्तेचा नाही, तर नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेच्या भावना डळमळीत करणारा आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने परिणामकारक उपाययोजना न केल्यास आम्ही पुढील कठोर भूमिका घेऊ.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!