अकोला दिव्य न्यूज : Plane Crash Investigation Report: इंडिया कंपनीचे एआय१७१ हे ड्रीमलायनर विमानाने १२ जून २०२५ दुपारी दीड वाजताच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि अवघ्या काही सेंकदात ते कोसळले. या दुर्दैवी अपघातात २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमानात एकूण २४२ लोक होते. त्यापैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला. पहिल्यांदाच ड्रीमलायनर विमानाचा इतका भीषण अपघात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले.
आता या अपघाताची चौकशी करत असलेल्या भारतीय विमान अपघात चौकशी विभागाने प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यातून खळबळजनक माहिती नोंदवण्यात आली आहे.उड्डाण केल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन एकदाच बंद पडले होते. त्याचबरोबर वैमानिकांमधील शेवटचा संवादही समोर आला आहे. एएआयबीच्या प्राथमिक तपासानुसार, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ ने १२ जून रोजी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन (RUN) मोडवरून कटऑफ (CUTOFF) मोडवर गेले होते.
दरम्यान कॉकपिटमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, तू इंधन पुरवठा का बंद केलास? तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ हा संवादही अहवालातून समोर आला आहे.
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांना पुरेसा विश्रांतीचा कालावधी मिळाला होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात पुढे नमूद केले की, काही सेकंद कटऑफची स्थिती राहिल्यानंतर ते बदलून पूर्ववत करण्यात आले. मात्र तोपर्यंत विमानाची उंची कमी झाल्यामुळे सुरक्षित पातळी गाठण्यासाठी वेळ मिळाला नाही. टेकऑफ आणि क्रॅश दरम्यान सुमारे ३० सेकंद विमान चालले, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या बोईंग ७८७-८ विमान आणि GE GEnx-1B इंजिनच्या ऑपरेटरवर कोणत्याही कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही.