अकोला दिव्य न्यूज : अकोला गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. अकोल्यातील कृषी नगरात दोन गटात राडा झाला. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान राडा झाला. या वादात जवळपास 8 जण जखमी झाले आहेत. अकोल्यातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील कृषीनगरात दोन गटात वाद झाला. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान वाद झाल्याची माहिती मिळत आहे. तलवारीसह बंदुकीचाही वादादरम्यान वापर झाल्याची माहिती मिळत आहे. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडले. या संपूर्ण वादात जवळपास 8 जण जखमी झाले आहेत.

कृषीनगरात गोळीबार झाल्याची चर्चा आहे. तर घटनास्थळावर 1 जिवंत काडतूस देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. तर एक हवेत गोळीबार झाला आहे. या वादातील जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज गुरुवार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता.
कृषीनगरातील वाद इतका भयंकर होता की, परिसरातील नागरिक आणि कृषीनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाला आहे. या वादानंतर काहीजण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस सर्वांची ओळख पटवण्याचे काम करत आहे.दरम्यान, कृषी नगरातील गँगवारमध्ये जवळपास १५ पेक्षा अधिक आरोपींचा यामध्ये समावेश आहे. घटनास्थळांवरील परिसरातील पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून वाद सुरू होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सतीश वानखडे यांच्या राहत्या घरावर हल्ला चढवत गॅंगवॉर झाला आहे. या घटनेत 8 जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह आणि पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. आरोपींच्या शोधात पाच ते सहा पथक रवाना झाले आहेत. कृषी नगरात गॅंगवॉर झाल्याने अनेक दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.