अकोला दिव्य न्यूज : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज निर्माल्य संकलन कलश रथ उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. शिक्षक जसे विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची शिकवण देतात, तसेच हा निर्माल्य रथ समाजाला पर्यावरणाची शिकवण देतो. श्रद्धा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश हा उपक्रम देतो, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी केले.

पंधरा वर्षांची सातत्यपूर्ण परंपरा : निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. धार्मिक श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरण संवर्धनाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते.

हार, फुले, दूर्वा, बेलपत्र आदी निर्माल्य थेट पाण्यात न टाकता संकलित करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते व त्यातून वृक्षसंवर्धनाला चालना मिळते. या उपक्रमामुळे जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण दोन्ही टाळले जाते.

शिक्षक दिन व निर्माल्य रथ – दुहेरी प्रेरणा : आयुक्त डॉ. लहाने म्हणाले की, “शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असून ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात, तसाच हा उपक्रम शहराचे पर्यावरण घडवतो. शिक्षक दिनी सुरू झालेला हा उपक्रम खर्या अर्थाने समाजाला दुहेरी प्रेरणा देणारा आहे.

निलेश देव यांचे समाजकार्य – प्रेरणादायी उदाहरण : शाडू मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळा असो, निर्माल्य संकलन उपक्रम असो, शाळा-शाळेत जाऊन ईकोबिस्ट संकलन असो की “करी बंग नाही म्हणा” या घोषवाक्याखाली महिलांना शिलाई मशीनद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे असो निलेश देव यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य घडवून आणले आहे. अशा प्रकारचे समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अकोल्यात कार्यरत असणे ही अभिमानाची बाब असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

या शुभारंभ सोहळ्यात मनपा उप आयुक्त विजय परतवार, आरोग्य विभाग प्रमुख संजय खोसे, झोन अधिकारी राजेश सरफ, सिध्दीविनायक मंदिर अध्यक्ष अँड. चंद्रशेखर जोशी, निनाद आठवले, प्रभाकर दौंड, अभिजीत परांजपे, संजय भालेराव यांच्यासह सिध्दीविनायक मंदिर संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

तसेच निलेश देव मित्र मंडळ तर्फे निलेश देव, जयंतराव सरदेशपांडे ,विनोद देव, प्रकाश जोशी, गणेश मैराळ, विश्वनाथ डांगे, नरेंद्र परदेशी, राजेंद्र गुन्नलवार, भास्करराव बैतवार, विजय वाघ, अनिल कुकुलवार, शाम नेने, रश्मी देव, मंजुषा घोटिकर, रामचंद्र उमरेकर, रविंद्र मेश्राम, मोहन काजळे व शशिकांत हिवरखेकर,ललन मिश्रा आशिष तिवारी यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले.असे राजु कनोजिया यांनी कळविले.
जठारपेठ परिसरातील अनेक मान्यवर व नागरिकांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.

नागरिकांना आवाहन : आयोजकांनी आवाहन केले की, नागरिकांनी श्रींच्या चरणी अर्पण केलेले हार, फुले, दूर्वा, बेल आदी निर्माल्य थेट विसर्जनास न नेता ‘निर्माल्य संकलन रथात’ जमा करावे, जेणेकरून श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम साधता येईल.
