अकोला दिव्य न्यूज : काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या दोन्ही गटांमध्ये सामंजस्य करण्यात, तणाव मिटविण्यात यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा ठरविण्यात आला होता. दोनच दिवसांपूर्वी मोदी मणिपूरला जाऊन आले. शांतता असली तर विकास वेगाने होतो, आम्ही मणिपूरसोबत आहोत, असे सांगून गेले. त्यांची पाठ फिरत नाही तोच रविवारी रात्री उशिरा चुराचांदपूरमधील कुकी नेत्यांची घरे जाळण्यात आली आहेत. मणिपूरमध्ये या भागात तणाव असून रात्री पुन्हा हिंसाचार सुरु झाला होता.

कुकी नॅशनल ऑर्गनायझेशनचे नेता केल्व्हीन एकेथांग यांचे घर रविवारी रात्री उशिरा जाळण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर स्थानिकांनी कोणी हल्ला केला नाही तर हे घर शॉर्ट सर्किटमुळे जळाल्याचे सांगितले. यावरून संभ्रम असताना आणखी एक कुकी नेता गिन्झा वुआलजोंग यांच्या घरालाही लक्ष्य करण्यात आले. स्थानिक आणि सुरक्षा दल वेळेवर पोहोचल्यामुळे आग वेळीच विझविण्यात आली.
केएनओ आणि युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ) या दोन प्रमुख कुकी-जो संघटनांनी ४ सप्टेंबरला केंद्र सरकारसोबत ऑपरेशन्स सस्पेंशन करारावर पुन्हा स्वाक्षरी केली होती. मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखणे, संवेदनशील भागातून संघटनेचे नियुक्त छावण्या काढून टाकणे आणि राज्यात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरतेसाठी उपाय शोधण्यासाठी काम करणे अशा अटी होत्या. यावर काम होईल, मणिपूर शांत होईल असे अधिकाऱ्यांना वाटले होते. राष्ट्रीय महामार्ग-२ सामान्य लोकांच्या आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो, असे कुकी संघटनांनी संकेत दिले होते. परंतू, नंतर राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्याची घोषणा केलेली नाही, असे स्पष्ट केले. यावरून पुन्हा राज्यात गोंधळ सुरु झाला होता. कांगपोक्पी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षा दलांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.पण केंद्राने चुकीचा अर्थ काढल्याचे केझेडसीने म्हटले.