Thursday, September 18, 2025
HomeUncategorizedमोठी बातमी ! मतांचा घोटाळा झाला असा ? राहूल गांधींनी पुरावेच सादर...

मोठी बातमी ! मतांचा घोटाळा झाला असा ? राहूल गांधींनी पुरावेच सादर केले

अकोला दिव्य न्यूज : Rahul Gandhi PC: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी काही मतदारांची नावं समोर आणली. हे मतदार एका विशिष्ट मतदारसंघातील आहेत. मात्र, त्यांची नावं वगळण्यासाठी त्यांच्या नावाने भलत्याच व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकानिशी अर्ज करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला, त्या व्यक्तींना स्वत: त्याबद्दल काही माहिती नव्हती. अशा दोन व्यक्तींनाही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत व्यासपीठावर बोलावलं होतं.

काय म्हणाले राहुल गांधी?
“मी विरोधी पक्षनेता आहे, मी हे सहज बोलत नाहीये. सबळ पुरावा हातात असताना मी हे बोलत आहे. हा पुरावा एकदम स्पष्ट आहे की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अशा लोकांना वाचवत आहेत ज्यांनी भारतीय लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. त्याशिवाय, ज्या पद्धतीने मतं वाढवली जात आहेत किंवा कमी केली जात आहेत हेही मी सांगणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
“प्रत्येक निवडणुकीगणिक काही लोक नियोजनपूर्वक इतरांची मतं कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. आपण आत्तापर्यंत हे ऐकत आलो होतो. आता आम्हाला त्याचा १०० टक्के पुरावा सापडला आहे. मी १०० टक्के पुराव्याशिवाय आता काहीही बोलणार नाहीये. माझं माझ्या देशावर, इथल्या लोकशाहीवर प्रेम आहे. आता निर्णय तुमचा आहे, मी फक्त तुमच्यासमोर पुरावा मांडणार आहे”, असं आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.

कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात काय घडलं?
यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात काय घडलं, याचे पुरावे सादर केले. “आलंद हा कर्नाटकमधला एक मतदारसंघ आहे. कुणीतरी तिथल्या ६०१८ मतदारांची नावं यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला. २०२३ मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली? हे आपल्याला माहिती नाही. ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहाथ सापडलं. एका मतदान केंद्रामधल्या अधिकाऱ्याला लक्षात आलं की त्याच्या काकाचं नाव वगळलं गेलंय. त्याने तपास केला असता शेजाऱ्यानं ते मत वगळल्याचं लक्षात आलं. पण शेजारी मात्र म्हणाला की मी असं काहीही केलेलं नाही. कारण एका वेगळ्याच प्रक्रियेतून हे नाव वगळण्यात आलं होतं, असा दावा राहुल गांधींनी केला.

आलंदमध्ये मतदारांची नावं वगळण्यासाठी ६०१८ अर्ज त्यांच्याच नावाने भरण्यात आले. ज्या लोकांच्या नावांनी हे अर्ज आले, त्यांनी ते कधी केलेच नव्हते. हे अर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक भरण्यात आले. त्यासाठीचे मोबाईल क्रमांक कर्नाटकबाहेर वेगवेगळ्या राज्यांमधले होते. आलंदमधील नावं वगळण्यासाठी हे क्रमांक वापरण्यात आले. काँग्रेसची मतं कमी करण्यासाठी हे करण्यात आलं. जिथे काँग्रेस पक्ष जिंकत होते, अशा मतदान केंद्रांवर हे करण्यात आलं”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

मतघोटाळ्याची उदाहरणं…
दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी मतघोटाळ्याची काही उदाहरणंदेखील उपस्थितांना दाखवली. “कुणीतरी बनावट लॉगइनच्या माध्यमातून कुणीतरी १२ मतं वगळण्याचा प्रयत्न केला. गोदाबाई म्हणतात, माझं नाव वगळण्यासाठी मी अर्ज केलाच नव्हता. यासाठी इतर राज्यांमधील मोबाईल क्रमांक वापरण्यात आले. हे मोबाईल क्रमांक कुणाचे आहेत? हे सगळं कसं घडवलं गेलं? घोटाळा करण्यासाठी ओटीपी कुणी तयार करवून घेतले? असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.
सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीने १४ मिनिटांत १२ मतदारांची नावं वगळल्याचं दिसून आलंय. त्याने नावं वगळण्याचे १२ फॉर्म १४ मिनिटांत भरले. ते स्वत: इथे आले आहेत. बबिता चौधरी नावाच्या व्यक्तीचं नाव त्यांनी वगळलं. त्याही इथे आल्या आहेत. पण या दोघांनीही नाव वगळण्यासाठीचा अर्ज केलेला नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

सुर्यकांत म्हणतात, मला माहितीच नाही
स्वत: सूर्यकांत यांनीही बबिता चौधरी यांच्यासमोर हे अर्ज आम्ही केले नसल्याचं व्यासपीठावर येऊन सांगितलं. “माझ्या नावावर १२ लोकांची नावं वगळली आहेत. पण मला माहितीच नाही. मी कधी कुणाला मेसेजही पाठवलेला नाही. बबिता चौधरींनी मला विचारल्यानंतर मला ते समजलं. पण मी कुणालाच याबाबत मेसेज केलेला नाही”, असं ते म्हणाले.


पहाटे ४ वाजता उठून मतदान यादीतील नाव वगळण्याचा अर्ज भरला!
दरम्यान, राहुल गांधींनी आणखी एक उदाहरण यावेळी सांगितलं. त्यात एका व्यक्तीच्या नावाने मतदाराचं नाव वगळण्यासाठी दोन अर्ज अवघ्या ३६ सेकंदांच्या अंतराने भरण्यात आले. विशेष म्हणजे हे अर्ज पहाटे ४ वाजता भरण्यात आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. “नागराज नावाच्या व्यक्तीच्या नावाने दोन अर्ज फक्त ३६ सेकंदांमध्ये भरले गेले. हे फॉर्म भरून बघा किती वेळ लागतो. तुम्हाला स्वत:लाच याचं उत्तर कळेल. शिवाय या व्यक्तीने पहाटे ४ वाजता उठून हे अर्ज भरले आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.


यानंतर राहुल गांधींनी दाखवलेल्या पीपीटी स्लाईडमध्ये चार मतदान केंद्रांवरील पहिल्या क्रमांकांच्या मतदारांची माहिती होती. “ही माहिती इतर मतदारांची नावं वगळण्यासाठी वापरली गेल्याचा आरोप त्यांनी केला. हे सगळं सॉफ्टवेअरच्या मदतीने केलं जात आहे. मतदारांची नावं वगळण्यासाठी हे सॉफ्टवेअर मतदान केंद्रांवरच्या पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीची माहिती घेतंय आणि इतर मतदारांची नावं वगळण्यासाठी त्याचा वापर करतंय. त्यामुळे कुणीतरी यासाठी ऑटोमॅटिक पद्धतीचा वापर केला ज्यातून मतदारांची नावं वगळण्यासाठी मतदान केंद्रांवरच्या पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीची माहिती वापरण्यात आली. त्याच व्यक्तीकडे राज्याबाहेरचे मोबाईल क्रमांक होते. ते अर्ज करण्यासाठी वापरण्यात आले. हे सगळं केंद्रीय स्तरावरून केलं जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
काँग्रेसच्याच प्रभावक्षेत्रातील मतदानकेंद्र लक्ष्य
“सर्वाधिक मतदारांची नावं वगळलेली १० मतदान केंद्र ही काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रातली होती. २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसनं या १० पैकी ८ मतदान केंद्रांवर विजय मिळवला होता. हा फक्त योगायोग नाही. ही एक नियोजित मोहीम आहे”, अशी आकडेवारी राहुल गांधींनी सादर केली.


मी निवडणूक आयुक्तांवर थेट आरोप का करतोय?
कर्नाटकमध्ये या प्रकरणाची चौकशी चालू आहे. कर्नाटकच्या सीआयडीनं १८ महिन्यांत निवडणूक आयोगाला १८ पत्रं लिहिली आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे खूप सोपी माहिती मागितली आहे. हे अर्ज जिथून भरले गेले, तिथला आयपी अॅड्रेस, जिथून अर्ज भरले गेले ती ठिकाणं आणि अर्ज भरल्यानंतर आलेले ओटीपी नेमके कुठे गेले याची माहिती मागवली गेली. पण निवडणूक आयोग ही माहिती देत नाहीये. कारण या माहितीच्या आधारे हे सगळं कुठून केलं जात आहे याची माहिती उघड होईल”, असं राहुल गांधी म्हणाले.
घटनाक्रम…
कर्नाटकमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला. राज्य सीआयडीनं निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातली माहिती मार्च २०२३ मध्ये मागितली. ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगानं उत्तर दिलं, पण त्यात माहिती दिलेली नव्हती. जानेवारी २०२४ मध्ये सीआयडीनं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून पूर्ण माहितीची मागणी केली. पण त्यावर उत्तर आलं नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये सीआयडीनं निवडणूक आयोगाला शेवटचं पत्र लिहिलं. हे सगळं होत असताना कर्नाटक निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि या माहितीची मागणी केली. अनेकदा ही मागणी केली गेली. पण त्यावर काहीही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे हा स्पष्ट पुरावा आहे की जे लोक हे करत आहेत, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींची मागणी काय?
“आता प्रश्न आहे की हे सगळं कोण करतंय? याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे आहे. हे जे कुणी करत आहेत, ते थेट भारताच्या राज्यघटनेवर हल्ला करत आहेत. आणि अशा लोकांना मुख्य निवडणूक आयुक्त वाचवत आहेत. ते कर्नाटकच्या सीआयडीलाही माहिती देत नाहीयेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना वाचवणं बंद केलं पाहिजे. आम्ही १०० टक्के पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे कुणीही नाकारू शकत नाही. निवडणूक आयोगाने आठवड्याभरात सगळी माहिती जाहीर करावी. नाहीतर ज्ञानेश कुमार घोटाळे करणाऱ्यांना वाचवत असल्यावर शिक्कामोर्तब होईल”, अशी मागणी यावेळी राहुल गांधींनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!