अकोला दिव्य न्यूज : जीवनातील नोकरी किंवा व्यवसाय हे पोट भरण्याचे व भौतिक गरजा पूर्ण करण्याचे साधन आहे. परंतु आपण जगत असलेले जीवन का जगावे ? याची शिकवण देण्यासाठी व जीवन सुसह्य करण्यासाठी एक तरी कला आपल्या अंगी असली पाहिजे. असे प्रतिपादन अकोला जिल्हा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड चे अध्यक्ष तथा अ. भा. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे यांनी केले.

स्थानिक आर. डी. जी. महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्य कर्मी तथा रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाचे सदस्य रमेश थोरात व प्रमुख अतिथी म्हणून नाट्य क्षेत्रातील व नाट्य प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असलेले देवदत्त पाठक व याच क्षेत्रातील त्यांचे सहकारी मिलिंद केळकर उपस्थित होते.
प्रारंभी रंगभूमी देवता नटराज, श्रीमती राधा देवी गोयनका यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सिद्धी गणेश प्रोडक्शनचे संचालक व शिबिराचे आयोजक सचिन गिरी यांनी प्रास्ताविक करून या शिबिराच्या आयोजना मागील हेतू विशद केला.

देवदत्त पाठक आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, आपल्या जीवनात जिद्द असावी व कोणतेही कार्य करण्याची लाज नसावी. या दोन गोष्टी अंगी असल्या तर मनुष्य आपल्या जीवनात भरपूर प्रगती करू शकतो. रमेश थोरात आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात एखाद्या तरी कलेची उपासना करून ती आत्मसात करावी. जेणेकरून ही कला त्यांना जीवनात सुंदर मार्ग दाखवून मोठे करू शकते.

दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात 14 वर्षाचे वर असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संकेत सहभाग घेतला आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील देवदत्त पाठक यांचे सह सिनेमा, नाट्य क्षेत्र, वेब सिरीज, टीव्ही सिरीयल यात काम करणारे प्रख्यात कलावंत किरण ठाकरे पावसकर, हरीश इथापे, सौरभ ठाकरे आधी दिग्गज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिर निशुल्क असून अजूनही त्यात विद्यार्थी आपली नावे नोंदवून भाग घेऊ शकतात.
भारतीय सेवा सदनाचे संचालक दिलीपराज गोयनका,आर. डी. जी. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले व सिद्धी गणेश प्रोडक्शन चे संचालक सचिन गिरी यांच्या नियोजनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी गीता जोशी, विष्णू क्षीरसागर, महेश इंगळे, अश्विनी ठाकरे, मोनिका अनासने, रोशन समदुरे, स्वराज पाटोळे, प्रमोद वानखडे, अक्षय पिंपळकर, साहिल सप्रे आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सचिन गिरी यांनी केले. अनेक पालक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.