अकोला दिव्य न्यूज : काश्मीर येथे झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारने विविध पक्षातील खासदारांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. ही शिष्टमंडळे त्या-त्या देशात जाऊन पाकिस्तानची पोलखोल करण्यासोबतच ऑपरेशन सिंदूरसह भारताच्या पाकिस्तानविरोधातील कारवाईची माहिती देतील. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी(शप) नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुस्लीमबहुल कतारला पोहोचले.

कतारमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, आज सोमवार 26 मे 2025 रोजी सकाळी भारतीय शिष्टमंडळाने कतारचे परराष्ट्र राज्यमंत्री डॉ. मोहम्मद बिन अब्दुलअझीझ बिन सालेह अल खुलैफी यांची भेट घेतली आणि पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाची माहिती दिली.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, दूतावासाने म्हटले की, ‘परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी कतारची भारतासोबत एकता, प्रादेशिक स्थिरता आणि समृद्धीसाठी दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीवर सहमती दर्शवली.’ दरम्यान, याच शिष्टमंडळाने रविवारी कतार शूरा कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. हमादा अल सुलैती आणि इतर कतारी संसद सदस्यांची भेट घेऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली होती.
या दौऱ्यातून सीमापार दहशतवादावर भारताची एकजूट भूमिका प्रतिबिंबित होते, यावर शिष्टमंडळाने भर दिला. सुप्रिया सुळेंव्यतिरिक्त, शिष्टमंडळात भाजप नेते राजीव प्रताप रुडी, अनुराग ठाकूर आणि व्ही मुरलीधरन, काँग्रेस नेते मनीष तिवारी आणि आनंद शर्मा, टीडीपी नेते लवू श्रीकृष्ण देवरायलु, आप नेते विक्रमजीत सिंह साहनी आणि माजी राजनयिक सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तलाही भेट देईल. कतार हा पश्चिम आशियाई प्रदेशात प्रभावशाली मानला जातो आणि प्रादेशिक संघर्षांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावतो.