अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील प्रतिक नगर येथे टॅटू आर्टिस्ट शांतिप्रिया कश्यपचा निर्घृण खून करून फरार झालेला आरोपी चेतन महादेव श्रृंगारेला अखेर 10 महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. चेतन हा मूळचा यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील हरसूल या गावचा रहिवासी आहे.तो फरार झाल्यानंतर मुंबईत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

काय घडली होती घटना?
अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर शहरातील प्रतीक नगरमध्ये 23 जुलै 2024 ला रात्री ही भयंकर घटना घडली होती.दुसऱ्या दिवशी, 24 जुलैच्या सकाळी गजानन महाराज मंदिराच्या मागील भागातील प्रतीक नगरमध्ये एका घरात शांतीप्रिया कश्यपचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती. शांती प्रिया प्रशांत कश्यप (वय वर्ष 26) मूळ रहिवासी आसाम राज्यातील असून अनेक वर्षांपासून ती तिच्या आईबरोबर दिल्ली शहरात राहत होती. शांती प्रिया ही प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट होती. या दरम्यान ,काही महिन्यांपूर्वी तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथल्या चेतन शृंगारे या तरुणासोबत झाली.
चेतनने शांतीप्रियाला काम देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरात बोलावलं होतं. साधारण 21 जुलै रोजी मूर्तिजापूर शहरात शांती प्रिया दाखल झाली. आणि चेतन तिच्यासोबत शहरातील वैशाली वाईन बारमध्ये गेला आणि काम मागितलं. मात्र बारमालकाने काम द्यायला नकार दिला. त्यानंतर दोघेही तिथून परतले. विशेष म्हणजे चेतन पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच वाईन बारमध्ये वेटरचे काम करत होता. दोघांचीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती.
प्रतीक नगर मध्ये हे दोघेही राहू लागले होते. मात्र त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात चेतनने डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे शांतीक्रियाचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे कार्यरत होते.हॉटेल व्यवसायिक शुभम सुभाष महाजन यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर चेतन श्रृंगारे फरार झाला होता.
चेतनच्या मूळ गावी हरसुलसह नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो कुठेच मिळून आला नाही.पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासोबत गुप्त बातमीदारांची मदत घेतली. अखेर मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथक मुंबईच्या सांताक्रुज परिसरात पोहोचले.स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून चेतनला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.मात्र खून केल्याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.पोलीस चौकशीत खुनाचं नेमकं कारण समोर येईल.