अकोला दिव्य न्यूज : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता आणखी एक घटना समोर आली आहे. ५० हजार रुपयांसाठी एक मुलाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. धारूरमध्ये उसने पैसे वसूल करण्यासाठी चार तरुणांनी एका तरुणाचे अपहरण केलं. मुलाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता ५० हजार रुपये टाका अन्यथा मुलगा तुम्हाला परत दिसणार नाही अशी धमकी दिली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात फक्त १० हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल ८० हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली. दरम्यान, आरोपींनी तरुणाच्या आईला फोन करुन धमकी दिल्याचे समोर आले. “मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही”, अशी धमकी आरोपींनी दिली.

ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. आरोपींनी या रकमेवर दिवसाला १ हजार रुपयांचे व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम ८० हजारांवर गेली.पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले.

अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून ५० हजार रुपयांची मागणी केली.पैसे दिले नाहीतर मुलाला सोडणार नाही, अशी धमकी त्या आरोपींनी आईला फोन करुन दिल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी धारुर पोलिसांनी तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
