Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यापालकमंत्री हरवले ! यवतमाळच्या शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

पालकमंत्री हरवले ! यवतमाळच्या शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत असताना जिल्ह्याचे ‘पालक’ म्हणून जबाबदारी असलेले पालकमंत्री संजय राठोड अनेक तालुक्यांत फिरकलेही नाहीत. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीसह, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, सिंचनाची असुविधा, वन्यप्राण्यांचा हैदोस यामुळे त्रस्त आहेत. परंतु, पालकमंत्र्यांना आपली कैफियत ऐकण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशोक धोबे, सुधाकर धोबे, प्रमोद खिरटकर, माणिक पांगुळ, संजय पारखी, नानाजी डाखरे, विजय धानोरकर , दौलत बदखल, सुरेंद्र काकडे, प्रमोद खंडाळकर, भास्कर दानखडे, संजय येरमे, नंदेश्वर आसुटकर आदी शेतकऱ्यांनी थेट मारेगाव पोलिसांत पालकमंत्री हरविल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीने शासन प्रशासनाचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे केवळ आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठीच उपलब्ध असतात. दिग्रस, दारव्हा, नेर या तीन तालुक्यातच त्यांचे सतत दौरे, कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने ते केवळ तीन तालुक्यांचे पालकमंत्री असल्याची उपरोधिक टीका त्यांच्यावर सातत्याने होत असते. वास्तविक यवतमाळ हा क्षेत्रफळ आणि तालुक्याच्या संख्येच्या दृष्टीने विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मात्र पालकमंत्री राठोड यांचा सर्व ‘फोकस’ आपल्या मतदारसंघातच असल्याने उर्वरित जिल्ह्यात नागरिकांची ओरड सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!