अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयसीसी विश्व चषकाच्या फायनल मॅचवर बुकी बाजारात जवळपास 90 हजार कोटींचा सट्टा लागला होता, अशी धक्कादायक माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. क्रिकेट सट्टेबाजीच्या इतिहासात एका सामन्यावर एवढ्या प्रचंड रकमेचा सट्टा पहिल्यांदाच लागला होता. बुकीबाजारातील हा एक नवाच विक्रम असल्याचेही बुकी बाजारातील सूत्रांनी सांगितले आहे. अकोला शहरातील सट्टा बाजारात देखील कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. अनपेक्षितपणे भारतीय संघांचे मॅचवरील वर्चस्व लयास गेल्याने सट्टा लावणा-यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे मानले जात आहे. अकोला येथील सट्टेबाजांनी नजिकच्या दोन तालुक्यात बस्तान बसवून व्यापार केला. लहानसहान बुकींची खायवाडी घेणाऱ्या दोहांनी शेजारच्या जिल्ह्यातून खायवाडी केली. पोलिसांचा आशिर्वाद पाठीशी असल्याने कालच्या सामन्यात बुकींना जबरदस्त मायलेज मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2023/11/1000064273.jpg)
दुबई आणि बँकाँकमधून संचलित होणाऱ्या बुकीबाजारात मध्य भारतातील नागपूर, इंदोर, भोपाळ, जबलपूर, रायपूर आणि या सेंटरशी कनेक्ट असलेल गोवा, मुंबई हे सर्व सेंटर अखेरपर्यंत चांगलेच तापून होते, असेही सुत्रांनी सांगितले. अकोलासह पश्चिम विदर्भातील बुकी यंदा इंदोर व रायपूर या सेंटरशी जुळले होते. मॅचमध्ये जेव्हा अनपेक्षित घडामोडी घडतात आणि बुकींचे अंदाज चुकतात तेव्हा त्याला बुकींच्या भाषेत कलर येणे म्हणतात. या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्येही अनेकदा कलर आले. या सामन्यात पहिली खेळी करणारा संघ किमान २५० रन बनवेल असा बुकींचा अंदाज होता. त्यामुळे २५० ते ३३० धावांसाठी ३० पैसे भाव देण्यात आला होता. मात्र तो चुकला, हेच काय ३०० ते ३५० धावांसाठी ४५ पैसे, ३५० ते ४०० धावा ६० पैसे आणि ४०० पेक्षा जास्त धावांवर ८० पैसे भाव देण्यात आला होता. मात्र, हे सगळेच अंदाज चुकले. भारत केवळ २४० धावांवरच थांबला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन विकेट जाताच पुन्हा सट्टाबाजारात कलर आला. भावांतही मोठे उलटफेर झाले. कांगारूंच्या हेड आणि लबूशेन यांनी २३ व्या षटकात सामन्यांवर जबरदस्त पकड घट्ट केली आणि सट्टा बाजार कांगारु ‘फेवर’ झाले आणि भाव २० ते २५ पैसे आले. भारतीय संघांचे भाव दिड रुपयांचा वर गेल्यावर शेवटी खायवाडी घेणाऱ्यांनी लगवाडी सुरु केली. यात खायवाडी घेणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला असल्याचे दिसून येते.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2023/11/1000064280-1024x1024.jpg)
गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये देश-विदेशातील १ लाख, ३२ हजार क्रिकेट रसिकांच्या साक्षीने रविवारी १९ नोव्हेंबरला विश्वचषकाची फायनल मॅच खेळली गेली. आंतरराष्ट्रीय बुकी बाजाराने विश्वविजेता म्हणून भारतीय संघाकडेच बोट दाखविले होते.मात्र शेवटी भारतीय संघाची शिकार करुन कांगारू शिकारी ठरले. पहिली इंनिंग सुरू असताना भारतीय संघाला एक रुपयाच्या बदल्यात ४६ पैसे तर ऑस्ट्रेलियाला ४८ पैसे भाव होता. अर्थात भारत जिंकणार म्हणून बुकीकडे कुणी एक हजार रुपये लावत असेल तर भारतीय संघ जिंकल्यास त्याला केवळ ४६० रुपये मिळणार, याऊलट ऑस्ट्रेलिया जिंकण्याचा दावा करणाऱ्यांना ४८० रुपये लावले तर १ हजार रुपये मिळणार. मात्र, जस-जसा सामन्यातील रोमांच वाढला तसतसे भाव कमी जास्त होत गेले. मात्र अखेरपर्यंत भारत फेवरेट चांगलेच तापून होते, असेही सुत्रांनी सांगितले.