Saturday, July 27, 2024
Homeसंपादकियगर्व तो है ही ! ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !

गर्व तो है ही ! ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जमिनीच्या वादाचा निकाल मशिदीविरोधात देऊन राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करताच भाजपची नवी पिढी अंधभक्तांसह जोर बैठका काढू लागली. मात्र त्यांनी १९९२ चा तो इतिहास एकदा तरी जरुर पाहावा. गेल्या काही दिवसांमध्ये त्यावेळच्या नेत्यांच्या मुलाखती एकमेकांना पाठवून लोक भाजपचा पळपुटा चेहरा उघडा करत आहेत. भाजप आणि अंधभक्तांनी कितीही झाकल तरी, ते झाकल्या जाणार नाही आणि सर्वव्यापी भगवान रामचंद्र यांनाही चांगले माहीत आहे की, कोण शुद्ध मनाने आणि कोण कपट दृष्टीने, का आणि कशासाठी करत आहे. असो!

विश्व हिंदू परिषदेने ६ डिसेंबर १९९२ चा मुहूर्त ठरवून देशातील हिंदूंना अयोध्येत कारसेवा करण्यासाठी निमंत्रण दिले. लालकृष्ण अडवाणी यांनी देशात सर्वत्र रथयात्रा काढली. प्रमोद महाजन या रथयात्रेचे महारथी होते. महाराष्ट्रात शासनाने रथयात्रेला अडवण्याची भाषा करताच शिवसेना प्रमुखांनी खणखणीत आवाजात रथयात्रा रोखाल तर पस्तवाल असे आव्हान दिले. नाशिक येथे पोलिसांनी रथयात्रेला परवानगी नाकारताच शिवसैनिकांनी रथाभोवती संरक्षक कडे तयार करून रथयात्रा पुढे नेली.

विश्व हिंदू परिषदेने कारसेवेसाठी अयोध्येत हिंदूजनांना निमंत्रण दिले असताना ६ डिसेंबरच्या तोंडावर दस्तुरखुद्द विहिंप प्रमुख अशोक सिंघल भूमिगत झाले. संघ आणि भाजपचे अनेक नेते अदृश्य झाले. भाजप नेत्यांनी तर बाबरी पाडली जाऊ नये म्हणून आटापिटा सुरू केला. भाजपला उत्तर प्रदेशचे सरकार वाचवायची चिंता पडली होती, याचा आजच्या भाजप नेत्यांना नेमका विसर का पडला ? असा बरबटलेल्या राजकारणातही तेव्हा झाल्या घटनेचा अभिमान बाळगणारे आणि आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटणारे एकमेव नेते होते, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे !

भाजपचे तत्कालीन आणि सर्वकालीन सर्वोच्च नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बाबरी पडल्याचे तीव्र दु:ख व्यक्त करताना म्हणताहेत –

  • What happened in Ayodhya on December 6  was very bad politics. It should not have happened. We tried to prevent it.  But we could not succeed.  We are sorry for that.  Karsevaks were out of control. They did something which was not to be done!l
  • बाबरी पडल्याचे दु:ख व त्या ऐतिहासिक कृतीची निंदा आणि निषेध करण्याची जणू एकमेकांशी स्पर्धाच भाजप नेत्यांनी केली. वाजपेयी, अडवाणी, रज्जुभैय्या, सुंदरसिंह भंडारी हे सर्व जण तेव्हा बाबरी पतनाबद्दल अश्रू ढाळताना देशाने पाहिले आहे.
  • गर्व तो है ही!
  • दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घुमट जमीनदोस्त करणाऱ्या शिवसैनिकांना शाबासकी तर दिलीच व त्यांचा गर्व वाटतो असे ठणकावून सांगितले. एखाद्या मोहिमेवर सैन्याला जमवायचे आणि त्या शूरवीरांनी मोहीम फत्ते करताच त्यांचा धिक्कार करायचा हे कोणताच सेनापती करणार नाही. शिवसेना प्रमुखांचे ते उद्गार याची साक्ष देतात आणि कर्तव्य पूर्ण करणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवतात. भाजप नेत्यांनी कारसेवकांच्या मनात आपण केले ते बरोबर की चूक असा संभ्रम निर्माण केला तर बाळासाहेबांनी ‘भले बहाद्दर’ म्हणून त्यांचा गौरव केला. एकमेव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामागे पहाडासारखे उभे राहिले. ‘आप की अदालत’मध्ये रजत शर्मा यांनी बाळासाहेबांना प्रश्न केला, ‘बाबरी ढाचा गिराते वक्त तो सबसे आगे शिवसेनाने झंडा गाड दिया और बड़े गौरव से उसे दोहराया’ त्यावर बाळासाहेब यित्कचितही न थांबता उद्गारले ‘गौरव तो है ही. बिलकुल इस में शर्म की कोई बात नहीं. बाबरी गिराई गई उस के निचे हमारे प्रभू राम का मंदिर था. उस को हमने उपर लाया. २५ नोव्हेंबर १९९२ – पंढरपूर येथील जाहीर सभेत शिवसेनाप्रमुखांनी अयोध्येत राम मंदिर होणारच आणि असंख्य शिवसैनिक तिथे जाणार अशी घोषणा केली.
  • राममंदिराच्या उभारणीसाठी लाखो शिवसैनिकांसह शिवसेनाप्रमुख अयोध्येत येणार या वृत्ताचे विहिंप, बजरंग दल व भाजप इत्यादी पक्ष संघटनांनी जोरदार स्वागत केले. मात्र विहिंपने केंद्र सरकार बाळासाहेबांना अयोध्येत येण्यापासून रोखणार असल्याची शक्यताही व्यक्त केली. ५ डिसेंबर रोजी शिवसेनाभवन येथे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या १०० आमदार, नगरसेवकांच्या पहिल्या तुकडीस आशीर्वाद दिला. शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येस निघालेल्या या तुकडीत शिवसेना नेते सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, सुभाष देसाई, आ. साबिर शेख, गणेश नाईक, नगरसेवक नंदू साटम, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे सहभागी झाले होते. रविवार, ६ डिसेंबरपासून अयोध्येत सुरू झालेल्या कारसेवेत संभाजीनगर येथून मोरेश्वर सावे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी तसेच हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील शिवसैनिक मोठया संख्येने सामील झाले होते.
  • शिवसेना भवन येथील बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना कारसेवेत सहभागी होण्याचा आदेश दिला. तेव्हा मनोहर जोशी म्हणाले, ‘अयोध्येत विश्व हिंदू परिषदेचे निर्णय आम्ही पाळू, पण रामजन्मभूमीजवळ फक्त भजनकीर्तन करण्यास सांगितले तर आम्ही ते कदापि ऐकणार नाही!
  • अयोध्येकडे निघालेल्या शिवसैनिकांच्या तुकडीला मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुखांनी राममंदिराची उभारणी हे पवित्र काम आहे. ते पूर्ण झाले नाही तर या देशाला भवितव्य उरणार नाही. उद्या अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार झालाच तर मी संपूर्ण हिंदूस्थानात वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दमच केंद्र सरकारला दिला. संजय राऊत यांनी त्यावेळीही भाजपच्या दुटप्पी वर्तनावर ‘सामना’च्या उत्सव पुरवणीतील रोखठोक सदरात (६ डिसेंबर १९९२) आसूड ओढले. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, वादग्रस्त बांधकामाचे संरक्षण केले जाईल अशी ग्वाही दिली. म्हणजे एकीकडे विश्व हिंदू परिषदेने कारसेवेसाठी अयोध्येत हिंदूजनांना निमंत्रण दिले आणि भाजपला मात्र उत्तर प्रदेशचे सरकार वाचवायची चिंता पडली होती, याचा आजच्या भाजप नेत्यांना विसर पडला काय ?
  • ६ डिसेंबर रोजी विराट हिंदू शक्तीने लष्करी तुकडीची तटबंदी भेदून वादग्रस्त बाबरी मशिदीवर चाल केली. या कारसेवकांनी बाबरीचे तीनही घुमट पूर्णपणे उद्ध्वस्त केले. मशिदीचे घुमट तोडणारे भारतीय जनता पक्षाचे वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नसून हे कृत्य शिवसैनिकांनीच केले असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी तात्काळ व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार केंद्राने बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली.
  • बाबरीचे घुमट पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे, असे छातीठोक विधान शिवसेना प्रमुखांखेरीज आणखी कोण करणार? बाळासाहेबांनी पुढे म्हणाले, ‘मी अत्यंत समाधानी आहे. या हिंदूस्थानात नेहरूंपासून नरसिंहरावांपर्यंत एकाही पंतप्रधानाने हिंदूंना न्याय दिला नाही. पण आज एकजुटीची वज्रमूठ आवळून हिंदूंनीच न्याय मिळवला आहे. ही एकजूट कायम ठेवायची असेल तर पक्षीय लेबल बाजूला टाका कारण साऱ्यांनी हिंदू म्हणून यात भाग घेतला पाहिजे.’
  • अयोध्येत बाबरी उद्ध्वस्त होताच जात्यंध मारेकरी मिळतील ती शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरले. मुंबईसह सर्वच हिंदूस्थानात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. पुन्हा एकदा शिवसेनाच हिंदू नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळेच अनेक नागरिकांनी दंग्यांना घाबरून मुंबई सोडण्याचा विचार चालवला होता तो रद्द केला. मुंबई वाचली, मुंबईकर वाचले ते शिवसेनेमुळेच.
  • आज अयोध्येत राममंदिर उभे राहात आहे त्याचा आनंद आहेच. परंतु त्या जागेवर आक्रमक बाबराने बांधलेली बाबरी पाडली गेली. त्यामुळेच ती जमीन मंदिर उभारणीसाठी मोकळी झाली, हे कोण नाकारेल? अंधभक्त मात्र शिवसेनेचे अयोध्या आंदोलनातील योगदान कबूल करीत नाहीत.
  • भाजप नेते तर प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा या घटनेचा राजकीय लाभ कसा घेता येईल, पुढची निवडणूक कशी जिंकता येईल याचीच फिकीर करीत आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!