Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीमोठी बातमी ! अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप की राष्ट्रवादी...

मोठी बातमी ! अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप की राष्ट्रवादी ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील. मात्र बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेश केल्याने चव्हाण देखील मध्यम मार्ग स्वीकारणार आहे का ?

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलं असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.दरम्यान, अशोक चव्हाण काही वेळाने पत्रकार परिषद घेतील आणि त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करतील, असा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. चव्हाण भाजपात जाणार की इतर कुठल्या पक्षाशी घरोबा करणार या प्रश्नाचं उत्तर या पत्रकार परिषदेत मिळू शकतं.

आमदारकीचाही राजीनामा?
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असावा, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोल यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.

फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!