अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत असून तिन्ही पक्षांचे जागावाटप निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. तर, महायुतीकडूनही जागावाटप योग्यवेळी जाहीर होईल, कुठलीही नाराजी असणार नाही, असे सांगितले जाते. त्यातच, आता शिवसेना उबाठा गटाकडून १८ जागांवर दावा करण्यात आल्याचे दिसून येते.
शिवसेना उबाठा गटाकडून राज्यातील १८ मतदारसंघात निवडणूक समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या लोकसभानिवडणूक समन्वयकांची यादीच शिवसेना उबाठाने जाहीर केली आहे. त्यामध्ये, मुंबईतील ४ आणि ठाण्यातील जागेवरही त्यांनी समन्वयकाची नियुक्ती केली आहे. तर, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागांवरील मतदारसंघात निवडणूक समन्वयक नेमले आहेत. त्याशिवाय कोकणातील रायगड तर प.महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि मावळ मतदारसंघातही समन्वयकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे, शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे १८ जागांवर दावा केल्याचं दिसून येत आहे.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/02/catsgftrr8_2024021179458-1024x768.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यात मूठ बांधली आहे. महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्यातच, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही महाविकास आघाडीत घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी या तिन्ही पक्षांचं जागावाटप कसं असेल आणि वंचितला किती जागा दिल्या जातील, यावर राजकीय वर्तुळाच चर्चा होते. तर, शिवसेनेकडून गत पंचवार्षिकमध्ये जिंकलेल्या १८ जागांवर दावा केला जात आहे. त्यातच, आज शिवसेना उबाठाकडून लोकसभेच्या १८ मतदारसंघातील निवडणूक समन्वयकांची नेमणूक करण्यात आल्याने ठाकरे गटाचा हा दावा जवळपास निश्चित झाला की काय, असेच म्हणता येईल.