Saturday, July 27, 2024
Homeराजकारणमोदींना आव्हान ! राष्ट्रवादीने घोटाळा केला ना ? मग चौकशी करा :...

मोदींना आव्हान ! राष्ट्रवादीने घोटाळा केला ना ? मग चौकशी करा : भाजपची कोंडी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भाजपाची ज्या राज्यात सत्ता नाही, त्या राज्यातील सरकारांविरोधात असहकार पुकारण्याची नवी पद्धत मोदी सरकारने सुरू केली असल्याची टीका शरद पवार यांनी केली. तसेच गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप केले होते. आमची मागणी आहे की, या घोटाळ्यांची त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे आव्हान पंतप्रधान मोदी यांना देत असताना शरद पवार यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यात पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले.

देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) प्रमुख शरद पवार यांनी केली. “ज्या नेत्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले, त्यांच्याविरोधात द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. पंडित नेहरुंनी देशातील संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले. भारताचे मोल जगाला उमजेल, याची जबाबदारी नेहरुंनी पार पाडली. संपूर्ण विश्वाने त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. पण पंतप्रधान मोदी त्यांच्या योगदानाला किंमत देत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या समोर माईक आला की लगेच ते पंडित नेहरुंवर टीका करण्यास सुरुवात करतात, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

भारताची लोकशाही संविधानावर आधारित असून मागच्या १० वर्षांत लोकशाहीवर हल्ले होत आहेत. आगामी निवडणुकीत मतदारच मोदी सरकारच्या चुकीच्या कामांना उत्तर देतील. एकाबाजूला लोकशाही धोक्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला एक ना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. युवकांना रोजगार मिळवण्यासाठी धडपडावे लागत आहे. तर महागाईचा दर वाढतच असून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकाच्या चुकीच्या धोरणांमुळे हे सर्व होत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

शरद पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून नव्या योजना आणि गॅरंटी देण्याची स्पर्धा सुरु आहे. पण मोदी की गॅरंटीला कोणतीही तारीख नाही. गेल्या सत्तर वर्षांत अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र गेल्या दहा वर्षांत मोदी यांची भूमिका देशाला दिशा देणाऱ्या व्यक्तींविषयी जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याची आहे. त्यामुळे लोकशाहीची चिंता वाटत आहे. नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ले करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम मोदी यांचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ज्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन भाजपला सत्तेवर आणले, ते आज कुठेच दिसत नाहीत. सत्तेच्या पंगतीत भलतेच जेवताना दिसत आहेत. ज्यांनी अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनीच चव्हाणांना भाजपमध्ये घेतले. भाजपने पक्ष, घरे तर फोडलीच, त्यासोबत पेपरही फोडण्याचे काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी आजवर जे आरोप केले, त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!