अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची येथे ८ मार्च रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत भाजपने १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/03/fasder_2024031188389.jpg)
केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल आणि इतर काही राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे जिथे ते युती करण्यात सक्षम आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधील उर्वरित जागा देखील घोषित केल्या जाऊ शकतात. कारण, त्या राज्यांतील राज्य शाखेने त्यांच्या शिफारसी पक्षाकडे पाठविल्या आहेत. पंजाब आणि हरयाणामधील निवडणुका साधारणपणे टप्प्याटप्प्याने नंतरच्या फेऱ्यांमध्ये होत असल्याने यास थोडा वेळ लागू शकतो. अकाली दलासोबत भाजपची चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन यातील अडथळा ठरत आहे.
आतापर्यंत काय झाले?
मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग, रमेश पोखरियाल निशंक, डी. व्ही. सदानंद गौडा, डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, संतोष कुमार गंगवार, बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी किंवा देबश्री चौधरी या नेत्यांना वा माजी मंत्र्यांना २०१९ नंतर संधी मिळाली नाही.
केवळ थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल झाले.
ओडिशामध्ये भाजपची नवी खेळी
ओडिशामध्ये मे २०२४ मध्ये एकाच वेळी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि बिजू जनता दलाच्या नेतृत्वाकडून युतीसाठी शेवटचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात हे दोन्ही पक्ष अनेक दशकांपासून एकमेकांविरुद्ध लढत आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. ओडिशातून अश्विनी वैष्णव यांच्यासाठी राज्यसभेची जागा मागितली तेव्हा पटनायक यांनी पंतप्रधानांना त्यासाठी होकार दिला. दोन्ही नेत्यांची नुकतीच पुन्हा भेट झाली तेव्हा औपचारिक युती किंवा जागेच्या तडजोडीचा मुद्दा गाजला.”