Saturday, July 27, 2024
Homeइतिहासबाबू मोशाय @ 53 ! माणसाला जगणं शिकवणारा 'आनंद' अजरामरच आहे

बाबू मोशाय @ 53 ! माणसाला जगणं शिकवणारा ‘आनंद’ अजरामरच आहे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आज १२ मार्च २०२४ रोजी ‘आनंद’ आपल्या वयाची ५३ वर्ष पूर्ण करुन ५४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. असं वाटतं की ‘आनंद’ चा जन्म (निर्मिती) अलिकडच्या दोन-तीन वर्षातील आहे. मुंबईत’आनंद’ १२ मार्च १९७१ ला प्रदर्शित झाला होता, माणसाला जगणं शिकवणारा हा सिनेमा आणि त्यातली आनंद ही भूमिका दोन्ही अजरामरच आहे. कॅन्सरमुळे होणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू अशी एका ओळीची कथा.. पण त्याभोवती जी प्रसंगांची आणि गाण्यांची गुंफण हृषिकेश मुखर्जींनी केली आहे त्याला खरंच तोड नाही. हृषिकेश मुखर्जींनी चित्रपट जसा लिहिला आहे तितकीच या चित्रपटाची जान आहे तो म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्नाने या चित्रपटातला केलेला अभिनय हा अगदी सहज सुंदर आहे. “जिंदगी और मौत तो उपरवाले के हातमें है जहाँ पनाह… इसे ना आप बदल सकते हैं न मै.. हम सब तो रंगमंच की कठपुतलींयाँ हैं जिनकी डोर उपरवालेके हात में बंधी है. कब कौन कहाँ कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता.” मृत्यू या शाश्वत सत्याचं तत्त्वज्ञान ज्या सहजपणे चित्रपटांतले दोन नायक आपल्या मनात हसत हसत उतरवतात ती खरोखरच हृषीकेश मुखर्जींचीच कमाल आहे.

संवाद आणि संगीत ही सर्वात जमेची बाजू
या सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे यातली गाणी.. ‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने’, ‘जिंदगी कैसी है पहेली’ , ‘कहीं दूर जब दिन ढल जाए सांज की दुल्हन…’ एकाहून एक सरस गाणी आणि त्याला दिलेलं सलील चौधरींचं संगीत हे आजदेखील कानात वाजतं. अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव, ललिता पवार, जॉनी वॉकर अशी तगडी स्टार कास्ट आणि राजेश खन्ना मध्यवर्ती आनंदच्या भूमिकेत. आयुष्याचं तत्त्वज्ञान आनंद आपल्याला त्या दोन-अडीच तासांमध्ये आपोआप सांगून जातो. हसता हसता रडवतो आणि डोळ्यांत आलेलं पाणी पुसायला तसंच जगायला शिकवतो. “जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही… बाबू मोशाय.” हा डायलॉग असेल किंवा “मै तुझे क्या आशीर्वाद दूँ बहन. ये भी तो नहीं कह सकता की तुझे मेरी उमर लग जाये!” कुठल्याही क्षणी हा सिनेमा पाहिला की ताजातवाना वाटतो. याचं कारण त्याचं कालातित असणं.

सिनेमा प्रदर्शित होऊन ५३ वर्षे झाली आहेत पण..
राजेश खन्नाची ‘आनंद’ ही व्यक्तिरेखा उत्तम आणि अजरामर तर ठरलीच. कारण राजेश खन्ना आनंदची भूमिका जगला आहे. चित्रपटात एका कॅन्सरग्रस्त माणसाचं हरहुन्नरी जीवन दाखवण्यात आलं आहे. तो तीळ तीळ तुटत मरत नाही… उलट प्रत्येक क्षण आयुष्याला त्याच्या पद्धतीने अत्यंत आनंदाने मिठी मारतो, कवटाळतो. आहे तो क्षण जगायचा पुढे काय होणार ते कुणाला ठाऊक? भास्कर डायरीत आनंद विषयी नोंदी करत असतो.

जेव्हा भास्कर त्याच्यासाठी होमिओपॅथी औषध आणायला गेलेला असतो त्याचवेळी बाबू मोशाय ही आरोळी ठोकत.. आनंद प्राण सोडतो… कारण त्याने दोस्तला (रमेश देव) सांगून भास्कर आणि त्याची रेकॉर्ड लावलेली असते. त्यानंतर रिळ फिरत राहतं.. भास्कर खोलीत येतो आणि त्याला म्हणतो पिछले छह महिनेंसे.. तुम्हारी बकबक सुनते आयाँ हूँ.. बाते करो मुझसे.. बाते करों.. आणि अचानक आवाज येतो.. बाबू मोशाय…आपणही चमकून पाहतो.. रेकॉर्डवर त्याचा आवाज आणि तो जिंदगी और मौत..चा डायलॉग ऐकू येतो.. दोन मिनिटांसाठी आपण स्तब्ध होतो. त्यानंतर भास्कर आनंद बाबतची शेवटची नोट डायरीत लिहितो आनंद मरा नहीं.. आनंद मरते नहीं.. सिनेमा प्रदर्शित होऊन ५३ वर्षे झाली आहेत.. पण हे वाक्य विसरता येत नाही !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!