Saturday, July 27, 2024
Homeराजकारणअकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचा पाठिंबा ? माजी आमदार सानंदा यांचे...

अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचा पाठिंबा ? माजी आमदार सानंदा यांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळणे आवश्यक असल्याने अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस पक्षात गंभीरपणे विचार/मंथन सुरु असताना, अँड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी मागणी करीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून दोन ठिकाणी समर्थन जाहीर देखील केले. त्यामुळे अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान अकोला लोकसभा मतदारसंघात अँड. प्रकाश आंबेडकरांच्याविरोधात उमेदवार द्यावा का? यावरून काँग्रेसमध्ये खल सुरूआहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून या मागणीला बळ दिले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी ते आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसपुढे राज्यातील त्यांच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला. कोल्हापूर व नागपूरमध्ये बिनशर्त समर्थन देखील जाहीर केले. वंचितकडून एकतर्फी पाठिंबा दिला जात असल्याने काँग्रेसवर नैतिक दबाव वाढत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आता काँग्रेसमधूनच ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची मागणी होत आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाध्यक्षांसह खा.राहुल गांधी, पक्षप्रभारी व काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठांना पत्र पाठवून आंबेडकरांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. पत्रात ते म्हणाले, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ‘मविआ’मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. ‘मविआ’च्या मुंबईतील सभेत देखील सहभागी झाले. त्यांनी २७ मार्चपर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पहिल्या टप्प्यामधील उमेदवार जाहीर केले. कोल्हापूर व नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवारांना समर्थन सुद्धा दिले आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अकोल्यात काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा.’

उर्वरित टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून त्यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टळू शकेल. त्यांनी अनेक जिल्ह्यात मोठ-मोठ्या सभा घेऊन पंतप्रधान मोदींविरुद्ध भूमिका मांडली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणे काँग्रेस व ‘मविआ’च्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याचा दावा सानंदा यांनी पत्रात केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!