अकोला दिव्य न्युज ब्युरो : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला तीन दिवसांपूर्वी पत्र लिहूनही त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा न दिल्याने आणि संविधानप्रेमी जनतेच्या मतांमध्ये होणारी विभागणी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केलं होतं. त्यानंतर आज वंचित आघाडीने पत्र लिहीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र वंचितच्या या पत्रावर आगपाखड करत आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/04/anandraj-ambedkar-prakash-ambedkar_2024041206392.jpg)
वंचितवर हल्लाबोल करताना आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आपले दि. ०४/०४/२०२४ रोजीचे माझ्या अमरावती मतदारसंघातील उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपल्या सदर पत्रात आपण माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार नामांकन दाखल करणार नाही असे आपल्या पक्षाने व अधिकृत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/03/26-March-2024_page-0001-729x1024.jpg)
आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, “मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझ्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका अशा फोनद्वारे सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. सदरहू मी तीन दिवस अगोदर पासून वंचित बहुजन आघाडीला पाठिंब्यासाठी पाठवलेल्या पत्रानुसार पाठिंब्याच्या प्रतिक्षेत होतो.आणि अखेरीस नाईलाजास्तव संविधान प्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊन भाजपा सरकार येऊ नये म्हणून माझ्या पक्ष संघटनेने निर्णय घेऊन माझी अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि संबंधित पत्र मी दिनांक ०३/०४/२०२४ ला माझ्या आधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केले. आता त्यामध्ये किंचितही बदल होणे शक्य नाही. तेव्हा आपण उशीरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनःच्छ आपले आभार आणि माझ्याकडून शुभेच्छा, अशा शब्दांत आनंदराज आंबेडकर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.