Saturday, July 27, 2024
Homeराजकारणआज संविधान 'अभय' ठेवणेच आद्य कर्तव्य ! संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या पाठीशी...

आज संविधान ‘अभय’ ठेवणेच आद्य कर्तव्य ! संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या पाठीशी : सौरभ खेडेकरांची ग्वाही

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशातील लोकशाही व संविधान ‘अभय’ ठेवणे आवश्यकच नाही तर सर्वच आद्य कर्तव्य आहे. देशातील लोकशाही संपुष्टात आणून, हुकुमशाहीची रुजवात करण्याचा डाव मांडला असून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धोकादायक आहेत. या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ही समतेच्या विचारधारेचे जतन करण्यासाठी व संविधानाचे मूल्य जपण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. त्यांच्या प्रचारात ताकदीनिशी उतरणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी केली.

स्थानीय जुन्या आरटीओ कार्यालय परिसरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात आज सोमवारी संभाजी ब्रिगेड कडून आयोजित पत्रकार परिषदेत सौरभ खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडची भुमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गजानन पारधी, विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश कवडे ,महानगर काँग्रेस कमिटीचे महासचिव कपिल रावदेव, युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सागर कावरे, संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा प्रभारी गणेश अंदुले, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नमन आंबेकर, युवक जिल्हाध्यक्ष निखिल खानझोडे, जिल्हा सचिव हर्षल देशमुख आदी उपस्थित होते.

देशातील ऐंशी टक्के जनता भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने त्रासून गेली असून अनेक वर्षापासून राज्यात पुरोगामी चळवळ गतिमान करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे राजकीय पक्षात परिवर्तन हे सन 2016 मध्ये झाले आणि तेव्हापासून संभाजी ब्रिगेड भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर आपली तीव्र प्रतिक्रिया उमटवत आहे.

आता देशात संविधान बदलण्याची भाषा होत आहे. महागाई व बेरोजगारीने संपूर्ण देश होरपळून निघत असून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत आहे. या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीच्या समवेत निवडणूक प्रचारात उतरत असून अकोल्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी प्रचारात उतरत असून त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शेकडो संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सेंवारत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने चंद्रपूर ,वर्धा, यवतमाळ,अमरावती आदि लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणे सुरू केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी डॉ अभय पाटील यांना संभाजी ब्रिगेड आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचे नमूद करीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करीत डॉ अभय पाटील यांच्या प्रचार अभियानात जोमाने काम करू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी आकाश कराळे,सुरज महल्ले, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कौशल, सोनू पानझाडे,रफिक कुरेशी, फरहान कुरेशी, अदनान शेख,तेल्हारा तालुका अध्यक्ष चेतन अकोटकर, कोषाध्यक्ष प्रशिक बोधडे समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश,विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!