अकोला दिव्य न्युज ब्युरो : पनामा घोटाळ्यात देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि उद्योगपतींची नावे समोर आली असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही कारवाई न करता तोडपाणी केली,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केला. या प्रसंगी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अभय छाजेड आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_2024-04-22-20-11-31-43_680d03679600f7af0b4c700c6b270fe7-1024x559.jpg)
पनामा घोटाळ्यातील कागदपत्रे मोदी सरकारकडे आहेत. त्यामध्ये अनेक मोठ्या उद्योगपतींचा समावेश असून, त्यांच्यावर कारवाई का झाली नाही,’ असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. मोदी सरकारने कारवाई करण्याऐवजी यामध्येही तोडपाणी केली, असा आमचा आरोप असल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामकाजावर टीका करताना २०१४ला दिलेली किती आश्वासने पूर्ण केली, याची तुलनाही केली पाहिजे; तसेच ही आश्वासने का पूर्ण झाली याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला असून, आर्थिक, नैतिक भ्रष्टाचार सुरू आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालावले असून, कुणाशीही चर्चा न करता शेतीविषयक कायदे केले. शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे हे कायदे मागे घ्यावे लागल्यानेच कांदा, गहू, तांदूळ निर्यातबंधी करून या सरकारने शेतकऱ्यांवर सूड उगवला आहे,’ असा आरोपही चव्हाण यांनी केला.
‘वंचित’ मतांच्या विभाजनासाठीच
भारतीय जनता पक्षाकडून मतांच्या विभाजनासाठी ‘वंचित’सारखा प्रयोग राबविण्यात आला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. मतांचे विभाजन होत असल्याचे जनतेला कळून चुकल्याने या निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारांचा फारसा फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून, मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.