Saturday, July 27, 2024
Homeसंपादकियफक्त 51.83 टक्केच महिलांनी बजावला अकोला पश्चिममध्ये मतदानाचा हक्क ! बाळापूरात सर्वात...

फक्त 51.83 टक्केच महिलांनी बजावला अकोला पश्चिममध्ये मतदानाचा हक्क ! बाळापूरात सर्वात जास्त

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काल 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात 58.50 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदारांच्या मतदानापेक्षा हे प्रमाण जवळपास 6.37 टक्क्यांनी कमी आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या 9 लाख 13 हजार 269 असताना फक्त 5 लाख 13 हजार 239 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या कमी होणे, चिंतनाचा विषय आहे.

अकोला मतदारसंघातील 6 विधानसभानिहाय झालेल्या मतदानात सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात झाले आहे, या मतदारसंघात पुरुष आणि महिला मिळून अवघे 51.83 टक्के मतदान झाले. तर या मतदारसंघातील 1 लाख 64 हजार 805 महिलांपैकी फक्त 85 हजार 423 महिला मतदारांनी ‘मत’ देण्याचा अधिकार/ हक्क बजावला. येथे महिलांच्या मतदानाची टक्केवारी 51.83 टक्के आहे. अकोला पुर्व विधानसभा क्षेत्रात केवळ 56.10 टक्केच महिलांनी मतदान केले आहे. सर्वात जास्त मतदान बाळापूर विधानसभा क्षेत्रात झाले असताना, येथे तब्बल 62.99 टक्के महिलांनी ‘मत’ देण्याचा आपला अधिकार बजावला आहे. या मतदारसंघातील 1 लाख 44 हजार 798 पैकी तब्बल 91 हजार 208 महिलांनी मतदान केले.

बाळापूर नंतर रिसोड विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा दुसरा क्रमांक लागतो. या क्षेत्रातील 1 लाख 50 हजार 157 महिलांपैकी 60.86 टक्के म्हणजे 91 हजार 386 महिलांनी मतदान केले.तर मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 44 हजार 884 पैकी 87 हजार 831 (60.62) आणि आकोट विधानसभा क्षेत्रातील 1 लाख 42 हजार 973 पैकी 85 हजार 459 महिला मतदारांनी आपले मत देण्याचे कर्तव्य पार पाडत, महिलांचा लक्षणीय सहभाग नोंदविला आहे. पण अकोला महानगरालगत असलेल्या अकोला पुर्व आणि पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील महिलांनी मतदान करण्यात अनुक्रमे 5 आणि 6 व्या स्थानांवर राहणं, हा चिंतनाचा विषय आहे.

अलिकडच्या काही निवडणुकांपासून मतदानात महिलांचा सहभाग बघून जय-पराजयाचा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला आहे. अशा काळात अकोला महानगरात संलग्न असलेल्या अकोला पुर्व आणि पश्चिम या दोन मतदारसंघातील महिला मतदार अनुक्रमे 5 आणि 6 व्या स्थानांवर राहणं चिंतनाचा विषय आहे. आपल्याला सामाजिक व आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि अधिक समावेशक समाज निर्माण करण्यासाठी महिलांचे सर्वच क्षेत्रात प्रतिनिधित्व गरजेचं आहे.आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी असलेले एकुणच जीवनमान आणि आज असलेले स्थान बघता, लक्षणीय बदल घडवून आणला गेला आहे.

मी महिलांनी मिळवलेल्या प्रगतीवरून समाजाची प्रगती मोजतो, त्यांचं हे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच वाक्य आजही प्रसिद्ध आहे. घटना समितीचे सदस्य आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी ब्रजलालजी बियाणी यांनी त्याकाळात राजस्थानी समाजातील ‘घुगंट प्रथा’ आणि विधवा विवाहसह अनेक अनिष्ट रूढी व परंपरांना छेद लढा दिला आणि या प्रथा कालबाह्य करण्यात यशस्वी झाले होते.आपल्या मुलींना त्याकाळात उच्च विद्याविभूषित केले. यासोबतच महिलांना मतदानाचा अधिकार नाकारणं हा एक प्रकारचा भेदभाव आहे आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी समान संधी मिळायला हवी, अस परखड विचार घटना समिती सदस्यांचा सभेत व्यक्त केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!