अकोला दिव्य न्युज ब्युरो : धनादेश अनादरन प्रकरणाची तक्रार, पुरावे आणि दाखल कागदपत्रे यांच्यात बरीच तफावत तर आहेच. यासोबत फिर्यादीला पैसे घेणे असल्याची बाब सिध्द झाली नाही. त्यामुळे धनादेश अनादरनाची तक्रार खारीज करुन आरोपी दोषमुक्त आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल चौथे सह मुख्य न्यायदंडाधिकारी व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश अनघा देसाई यांनी दिला. तब्बल 17 वर्षांपर्यंत चाललेल्या या धनादेश प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
अकोला शहरातील राजेश्वर हायटेक प्रिंटर्सचे भागीदार अमरचंद शर्मा यांच्या विरोधात कमलकिशोर गिरधारीलाल या बॅंक ब्रोकर्स व्यवसायीक प्रतिष्ठानचे पुरुषोत्तम शर्मा यांनी 20 लाख रुपयांचे धनादेश अनादरीत केल्याबद्दल वर्ष 2008 मध्ये न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. अकोला जिल्हा न्यायालयात पुरुषोत्तम शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले होते की, राजेश्वर हायटेक प्रिंटर्सचे भागीदार अमरचंद शर्मा यांच्यासोबत 25 लाख रुपये व्यवहार करताना, वर्ष 2007 मध्ये अमर शर्मा यांनी 20 लाख रुपयांचे 10 धनादेश त्यांना दिले होते. सदर धनादेशावर लिहीलेल्या तारखेला ते धनादेश वटविण्यासाठी पुरुषोत्तम शर्मा यांनी स्वतःच्या बॅक खात्यात जमा केले होते. पण तारखेच्या टप्प्यात सगळे धनादेश अनादरीत होऊन परत आले. त्यानंतर अमर शर्मा यांना रितसर नोटीस बजावण्यात आली आणि नोटीसीतील मुदत संपल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240507-WA0147.jpg)
या संदर्भात पुरुषोत्तम शर्मा यांनी एकुण 4 प्रकरण दाखल केले होते. जवळपास 17 वर्षांपर्यंत न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून पुरावा व आवश्यक कागदपत्रे सादर करीत जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. राजेश्वर हायटेक प्रिंटर्सचे भागीदार अमरचंद शर्मा यांच्या बाजूने युक्तिवाद करताना, असा कुठलाही व्यवहार झालाच नाही. असा दावा करीत 25 लाख रुपये देवाणघेवाण झाल्याचा पुरावा प्रकरणात सादर केला गेला नाही. असं जोरदारपणे सांगितले. तसेच दिलेली तक्रार आणि त्या अनुषंगाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बरीच तफावत असल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
विशेष म्हणजे धनादेशवरील स्वाक्षरी आणि अमर शर्मा यांची स्वाक्षरी यामध्येही तफावत असल्याचे न्यायालयाच्या निर्दशानास आणून दिले. प्रतिवादी अमरचंद शर्मा यांच्या विधीज्ञांनी जोरकसपणे न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रांतील स्पष्ट केलेली तफावत लक्षात घेत, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने ‘क्लोज फॉर आर्डर’ साठी ठेवले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे विधीज्ञ आणि व्यवसायीकांचे लक्ष लागून असताना, चौथे सह मुख्य न्यायदंडाधिकारी व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश अनघा देसाई यांनी प्रतिवादीकडून करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून फिर्यादी पुरुषोत्तम शर्मा यांना पैसे घेणे असल्याची बाब सिध्द झाली नाही,असे स्पष्ट केले.तसेच धनादेश अनादर प्रकरणाची तक्रार, पुरावे आणि दाखल कागदपत्रे यांच्यात बरीच तफावत आहे. यामुळे सदर प्रकरण खारीज करुन आरोपीला दोषमुक्त करण्यात येत आहे, अशा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240507-WA0147-1.jpg)
प्रतिवादी अमरचंद शर्मा यांच्या वतीने अँड.एस.एस.जोशी, अँड. आर.एम. चांडक यांनी बाजू मांडली आणि अँड.आशिष तिवारी, अँड.अभिषेक आर चांडक, अँड. गिरीराज एस जोशी, अँड.समीर पुरवार, अँड.हेमांशी जी जोशी यांनी मदतनीस म्हणून काम केले. वादी पुरुषोत्तम शर्मा यांची बाजू अँड. दिलीप गोयनका, अँड.अजय मोहता, अँड.राहूल गोयनका, अँड.पूनीत गोयनका यांनी मांडली.