अकोला दिव्य न्युज ब्युरो : चार जीन परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यावसायीक अरुणकुमार वोरा अखेर दोन दिवसांच्या कालावधीनंतर काल बुधवार 15 मे रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पोलीस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. व्यापारी वोरा यांचं अपहरण खंडणी वसूल करण्यासाठी केले गेले होते, अशी माहिती आहे. तर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या अपहरण प्रकरणाला अनेक कंगोरे असून, खंडणीसाठी की मानसिक दबाव की अजून काही पार्श्वभूमी आहे.हे उघडकीस येईल.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240516-WA0064-1024x760.jpg)
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दगडी पुलनजीकच्या चार जिन परिसरात काचेच्या रिकाम्या शिशांचा (बाटली) व्यवसाय करणारे व्यापारी अरुण कुमार वोरा यांचे सोमवार १३ मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दगडी पुल रस्त्यावरुन अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायीकाचे अपहरण झाल्यामुळे इतर व्यावसायिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे अपहरण होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटूनही त्यांचा शोध लागला नसल्याने चर्चेला तोंड फुटले होते.
अपहरण हाेऊन दाेन दिवसांचा कालावधी झाला होता. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार रामदास पेठ पाेलिसांनी अपहृत वाेरा यांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे इनाम जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणातील आराेपींचा शाेध घेऊन वाेरा यांना घरी सुरक्षित आणण्याच्या उद्देशातून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांची भेट घेऊन चर्चा केली.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240516-WA0064-1-1024x760.jpg)
तसेच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासोबत आ.सावरकर यांनी भ्रमध्वनीवरून चर्चा करीत या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याची मागणी केली होती. यावेळी आ.सावरकर यांनी अरुणकुमार वाेरा यांच्या कुटंबियांची भेट घेतली होती. मात्र अरुण वोरा हे काल सुखरुप घरी पोहोचले आहेत. ( सविस्तर बातमी लवकरच)