Saturday, July 27, 2024
Homeसंपादकियउडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे ? कायद्याचा वाटेवर 'काय-द्याल' वृत्ती !

उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे ? कायद्याचा वाटेवर ‘काय-द्याल’ वृत्ती !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : एक अल्पवयीन मुलगा अजूनही नोंदणी न झालेली वडिलांची आलिशान मोटार घेऊन ‘पार्टी’ करायला बाहेर पडतो काय, ‘पार्टी’ झाल्यावर तब्बल ४८ हजार रुपयांचे देयक अदा करुन १६० किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवतो काय, वेगामुळे नियंत्रण सुटून रस्त्यावरून चाललेल्या दुचाकीला उडवतो काय आणि त्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण हवेत फेकले जाऊन मग जमिनीवर जोरात आपटल्याने मृत्युमुखी पडतात काय ! सुन्न करणारा हा प्रकार आणि ज्या पिढीची आम्ही ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ वगैरे म्हणून चर्चा करतो, त्या पिढीचे हे सुटलेले भान रस्तोरस्ती आपल्या बेमुर्वतखोर वर्तनाने उच्छाद मांडते आहे. पुणे येथील कल्याणीनगर येथे घडलेला प्रकार, ‘बेमुर्वतखोर वर्तनाने उच्छाद’ यातीलच , या प्रकारात फरक एवढाच की, आरोपी धनाढ्य कुटुंबातील आहे. मात्र सर्वच धनाढ्य लोकांची स्वतःची किंवा त्यांच्या पाल्याची वागणूक अशीच आहे, हे मानने किंवा बोलणं जरा धाडसाचं होईल. अपवाद प्रत्येकवेळी असतोच, त्यामुळे या प्रकरणातील धनाढ्य/नवश्रीमंतीचा अपवाद वगळला तर असं बेमुर्वतखोर वर्तन मध्यमवर्गीयातील पाल्यांमध्येही सर्रासपणे दिसून येते,असं म्हटलं तर ते चुकीचे नाही. येथे ही अपवाद आहे. नाण्याची एक बाजू काळीकुट्ट असेल तर दुस-या बाजूला लख्ख प्रकाश आहे. हे लक्षात ठेवा.

पुणे येथील प्रकार, ‘बेमुर्वतखोर वर्तनाने उच्छाद’ या प्रकारातील असून, आरोपींना शिक्षा देण्याचे काम न्यायव्यवस्थेचे आणि त्यांना योग्य शिक्षा मिळेल, यासाठी योग्य पद्धतीने तपास करण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, पोलिसांपासून ते चुकीचे अहवाल देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत या सर्व संवेदनशून्य यंत्रणेने हे दोन खून केले आहेत आणि अशा मुजोर बाळांना मोकाट सोडले आहे ! हे मस्तवाल बाळ आणि यंत्रणेतील संवेदनशून्य अधिका-यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत ! पण अद्दल घडवणार कोण? एकूणच व्यवस्थेसमोर जे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर एवढेच की, कायद्याचा वाटेवर चालणा-यांची ‘काय-द्याल’ ही वृत्ती !

पुण्यात घडलेला अपघात किंवा घटना, काही देशातील पहिला अपघात अथवा घटना नाही.तर अशा प्रकारच्या शेकडो घटना दररोज देशातील विविध राज्यातील विविध गाव-शहरात घडत आहेत. गंभीर अपघात झाला की, समाजजीवन दोन-चार दिवस आक्रमक होते. शासनाकडून आर्थिक मदत आणि प्रशासनाकडून चौकशीचा फार्स केला जातो. तथाकथित तज्ञ, सुधारवादी, उदारमतवादी व समाजसुधारक, समाजसेवक आणि सामाजिक संघटनांकडून अपघात वा घटना आणि त्या अनुषंगाने मोडलेल्या नियमांची चर्चा करुन मोकळे होतात.

वर्षानुवर्षे हेच सोपस्कार पार पाडून घेण्यापेक्षा सामान्यजनही आपापल्या पातळीवर नियमांची किती पायमल्ली करत असतात आणि नियम मोडण्याचे हे सार्वत्रिक आकर्षण कोठून येते, हेही तपासून पाहिले पाहिजे. यापेक्षाही या घटनेच्या निमित्ताने समाज म्हणून पाल्य, पालक, पुढारी, पोलिस, न्यायालय, व्यवसायीक आणि विविध सामाजिक संघटना इत्यादींनी आपल्या वर्तनाचेही अवलोकन करणे गरजेचे नाही का !

भारताची लोकसंख्या वृद्धत्वाच्या जगात सर्वात तरुण असून पर्यंत, भारतातील सरासरी वय 28 वर्षे जाहीर केले गेले आहे; त्या तुलनेत चीन व युनायटेड स्टेट्समध्ये ते 37, पश्चिम युरोपमध्ये 45 आणि जपानमध्ये 49 ठरवले असल्याने, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड भारतीयांसाठी खूप-खूप महत्त्वाचा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाने प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये एकूण वाढीच्या 15 टक्के पर्यंत योगदान दिले आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंडमुळे कार्यबल वाढण्यास मदत होते.

वेगाने शहरीकरण आणि औद्योगिकीकरण होऊन भौतिक आणि मानवी पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक होते. पर्यायाने श्रमशक्ती वाढल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढते. लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाच्या मदतीने मध्यमवर्गीय समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडत असल्याने, झपाट्याने शहरीकरण होत आहे. परंतु शहर विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये केवळ इमारती वाढून चालत नाहीत, तर सांस्कृतिक घुसळण आणि नंतर त्या मंथनातून नवोन्मेषाच्या शक्यता असाच प्रवास व्हावा लागतो. शहराच्या गरजा वाढतात, तसे त्या भागवणाऱ्या सेवांचाही विस्तार होणार. त्यांना घातलेल्या नियमांचे कुंपणच व्यवस्था तर खात नाहीत ना आणि त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपलाही सहभाग तर नाही ना, याची पडताळणी करत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

देशभरात सगळीकडेच बेदरकारपणे वाहने चालवणे आता सर्रास झाले आहे. सिग्नल मोडणे, दुचाकीवरून तिघातिघांनी प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे आणि त्याचे समर्थन करणे, ‘नो एंट्री’तून येणे, ‘राँग साइड’ने जाणे, नियम पाळणाऱ्यांवरच अरेरावी करणे हे समाजाच्या अनारोग्याचेच लक्षण असते. ही नोंद महत्त्वाची अशासाठी, की समाजमाध्यमांतून या घटनेबद्दल रोष व्यक्त होताना, जी शाब्दिक चकमक होते. त्यामध्ये ‘स्वयंशिस्त’साठी काहीच नसतं.

देशासाठी, राज्यासाठी कायदा बनविणारे आम्हीच आणि कायद्याची अंमलबजावणी करणारेही आम्हीच, यामुळे ‘सैया भये कोतवाल,तो डर काहे’ या मानसिकतेत वावरणारे मोठे नेते त्यांचे छुटभैय्ये नेते, छोटे छोटे बगलबच्चे व शेफारलेले कार्यकर्ते, निर्ढावलेले अधिकारी, कर्मचारी, निवडणूक फंड देऊन कायद्याला स्वतःच्या दावणीला बांधून ठेवणारे उद्योजक, व्यापारी, नवश्रीमंत, दास्यत्व पत्कारेली माध्यमे आणि तथाकथित समाजसेवक अशा या साखळीत सगळ्यांसाठी काहींना काही सोय आहेच. त्यामुळे नियमपालनाची संस्कृती जोपासणार तरी कोण ? हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असणारा, ‘हम किसी से कम नही’ या आविर्भावात कायद्याची लक्तरे वेशीवर टांगून ठेवले तर चुकीचे कसं ! जो साखळीतील दुवा नाही आणि कायदा मोडीत काढण्याच धाडस नाही. तरीही ओरडून ओरडून सांगत असेल तरी ऐकणार कोण ?

‘उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे ?’ हे मराठी व्यंकटेश स्तोत्रातील प्रसिद्ध उद्धृत आहे. याचा अर्थ होतो की, माणूस म्हणलं की त्यात बरे वाईट दोन्ही प्रकारचे गुण असतातच. माणूस म्हणून फक्त सदगुणांचा पुतळाच असतो असं नाही, पण म्हणूनच प्रत्येक माणसाने आपल्यातले वाईट, नकारात्मक गोष्टी, वाईट सवयी दूर करण्याचा प्रयत्न करीत चांगल्या गुणांची, चांगल्या स्वभावाची जोपासना केली तरच तरुण लोकसंख्येच्या लाभांशाचा फायदा होईल.अन्यथा येरे माझ्या मागल्या….बडवत बस घंटा ! या वेगळं काहीही होऊ शकतं नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!