Saturday, July 27, 2024
Homeसंपादकियमुलांच्या हाती मृत्यूची चावी ! पालकांनो, वेळीच सावध व्हा, अन्यथा ......

मुलांच्या हाती मृत्यूची चावी ! पालकांनो, वेळीच सावध व्हा, अन्यथा ……

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पुणे येथील पोर्श कार अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी केल्यानंतर, तरुण पिढी बेभानपणे भरधाव वेगाने दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविता होणारे अपघात आणि यामध्ये वाहनस्वारासह इतरांची होणारी प्राणहानी व अशा घटनेतील आरोपीला पाठीशी घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या गैरकायदेशीर कृत्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. तरीही या घटनेनंतर राज्यात दररोज अपघात होवून निष्पाप जीवांचा बळी जात असतै, आज पर्यंत अपघातात मृत्यूसाठी अपवाद ठरलेल्या अकोला शहरातील टिळक रोडवर अपघात होवून एकाचा मृत्यू झाला.

टिळक रोडवर गुरुवारी रात्री १०:३० ते ११ वाजताच्या दरम्यान सुसाट वेगाने धावत असलेली नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी समोरून येणाऱ्या एम एच ३० ए. एस ३९५६ या मोपेड वर येवून आदळली. अपघात एवढा भयानक होता की, दोन्ही दुचाकीवरील चालक हवेत १५ ते २० फूट वरती फेकल्या जावून जमिनीवर आदळले. घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला. या अपघात दोन्ही दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही गाड्या एकमेकात फसल्या गेल्याने अपघातातील दुचाकीचा वेग किती भयंकर होता याचा अंदाज लागू शकतो. विशेष म्हणजे मृतकाचे आई आणि वडील आज शुक्रवारी हज यात्रेसाठी रवाना होणार होते. अकोल्यातील हा अपघात अंगावर शहारे आणणारा आहे. तारुण्याचा हा कुठला रुबाब ? आपलं काही बरेवाईट झाले तर कुटुंब उघड्यावर आल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात का ठेवत नाही.

काल रात्री शहरात झालेल्या या अपघातात दुचाकीला उडविल्याची घटना संपूर्ण शहरात गाजत असताना या पार्श्वभूमीवर अकोला शहरासह जिल्ह्यातील शहरांत ‘रिॲलिटी चेक’ केला असता, अल्पवयीन मुले सर्रास दुचाकी वाहने चालवित असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.लहान मुलांचे अतिलाड कोणते संकट उभे करतील, हे पुणे शहरातील ‘पोर्श’ कार अपघाताने समोर आणले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे गुन्हा आहे. मोटार वाहन अधिनियम कलम पाच अंतर्गत वाहन चालविल्यास अल्पवयीन मुलाच्या पालकाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाऊ शकतो.

कायद्याने अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास प्रतिबंध केला असला तरी प्रत्यक्षात मात्र अकोला शहरासह अकोट, मुर्तिजापूर, बाळापूर,या शहरातही अल्पवयीन मुले भरधाव वेगाने दुचाकी वाहन चालवित असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे बिनदिक्कतपणे ट्रिपल सीट प्रवास करतात. कोणी हटकत नसल्याने, पालकही फारशे गंभीर नसल्याने आणि कायद्याचा धाक उरला नसल्याने अल्पवयीन मुले सर्रासपणे शहरांतून वर्दळीच्या ठिकाणांवरून भरधाव वाहने चालवितात. हा प्रकार वेळीच रोखला नाही तर भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहेत.

पालकांनो, वेळीच सावध व्हा!

पालकांनो, तुम्ही पण लहान मुलांच्या हाती कार, बाईक, स्कूटीची चावी (चाबी) देत असाल तर वेळीच सावध व्हा. अल्पवयीन पाल्याच्या हातून कोणतीही अप्रिय घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांवरच असते. अल्पवयीन मुलांच्या चुकीसाठी पालकांना केवळ दंडच नाही तर तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनाची चावी देताना पालकांनी गांभीर्याने विचार करावा.

नियम काय सांगतो?

साधारण ‘लायसन्स’साठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे. तर, १६ ते १८ वयोमर्यादेतील अर्जदारांना ५० सीसी क्षमतेचे वाहन चालविण्याचे लायसन्स दिले जाते. १८ वर्षांपुढील व्यक्तीला २० वर्षे मुदतीचे लायसन्स दिले जाते. अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास पाच हजारांचा दंड व संबंधित मुलाच्या पालकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!