अकोला दिव्य न्युज ब्युरो : महानिर्मितीच्या पारस वीज केंद्राने वीज उत्पादनात कायम नावलौकिक राखला असून २५० मेगावाट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग मागील २५० दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने वीज उत्पादनाच्या क्षेत्रात या संचाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पारस संच क्रमांक-३ च्या नावे या अगोदर अखंडित वीज उत्पादनाची १६६ दिवसांच्या विक्रमाची नोंद आहे. पारस संच क्रमांक ४ ने या २५० दिवसांत १२९०.४८१ मिलियन युनिटस आणि सरासरी २१५ मेगावाटसह वीज उत्पादन केले आहे.
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240323-WA0298-1024x754.jpg)
महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात अखंडित वीज उत्पादनात चंद्रपूर वीज केंद्र २१० मेगावाट संच क्रमांक ३ च्या नांवे सन २००९ मध्ये २६६ दिवसांच्या अखंडित वीज उत्पादनाच्या विक्रमाची नोंद आहे. पारस वीज केंद्राने नोव्हेंबर-२०२३ (९०.२२ %), जानेवारी-२०२४ (९१.०२%) आणि फेब्रुवारी-२०२४ (९५.५५%) मध्ये मासिक महाराष्ट्र वीज नियामक आयोग उपलब्धता घटक वर Zero Disallowance ”शून्य नामंजूर” लक्ष्य यशस्वीरीत्या साध्य केले आहे हे विशेष.
पारस वीज केंद्राने ने २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी-२०२४ (९३.९७%) मध्ये सर्वाधिक मासिक केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक गाठले आहे. पारस वीज केंद्राने ऑगस्ट-२०२३ पासून मासिक विशिष्ट इंधन वापर वर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली आहे. पारस वीज केंद्राच्या या उत्तम कामगिरीबाबत महानिर्मिती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, संचालक-कार्यकारी संचालक वर्ग यांनी पारस मुख्य अभियंता आणि चमुचे हार्दिक अभिनंदन केले आहे. उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज असल्याचे मुख्य अभियंता शरद भगत यांनी सांगितले.
ब्रजलालजी बियाणी यांच्या दूरदृष्टीची फलश्रुती
![](https://www.akoladivya.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240323-WA0299-1024x385.jpg)
मध्यप्रांताचे तत्कालीन अर्थमंत्री ब्रजलालजी बियाणी यांनी पश्चिम विदर्भातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व वेगळ्या विदर्भासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढा देणारे ब्रजलालजी बियाणी यांनी त्यावेळीच विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक आणि भविष्यात विदर्भातील वीजेची मागणी व वीजपुरवठा याचा अंदाज बांधता मध्यप्रांताचे अर्थमंत्री असताना, पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यामधिल बाळापूर तालुक्यातील पारस या छोट्या गावात पाण्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व भविष्यात वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा ठरणार,हे लोकांना समजावून सांगितले. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मध्यप्रांताचे अर्थमंत्री असताना ब्रजलालजी बियाणी यांनी हा प्रकल्प पूर्ण करुन घेत,प्रत्यक्षात वीज उत्पादनाला सुरुवात झाली. वीज निर्मिती झाल्यानंतर, बटन दाबून बियाणीजींनी वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या सुरू केल्या. त्यानंतर प्रगत तंत्रज्ञानासोबत पारस वीज निर्मिती प्रकल्पाचा विस्तार होत गेला. त्यावेळी सुरू केलेला हा प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टीची फलश्रुती आहे. कर्तृत्वाचा साक्षीदार आहे.